केरळ गावाचे भाग्य उजळले; नागरिकांमधून समाधान
पाटण (प्रतिनिधी) -पाण्याच्या सुविधेपासून वर्षानुवर्षे वंचित राहिलेल्या केरळ ता. पाटण या गावाचे भाग्य उजळले आहे. केरळ नदीवर बांधण्यात आलेल्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यामुळे या परिसरातील 98 हेक्टर शेती ओलिताखाली येणार असून कित्येक वर्षाचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे. इच्छाशक्ती असेल तर काहीही करता येतं हेच या बंधाऱ्याच्या कामामुळे सिद्ध झालं आहे.
पाटणच्या उत्तर बाजूस असणाऱ्या मणदुरे विभागाला अनेक वर्ष पाण्याच्या समस्येने ग्रासले होते. त्यासाठी या विभागाला कायमस्वरुपी पाणी पुरवठा करण्यासाठी उपाय योजना करावी या हेतूने माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी आघाडी शासनाच्या काळात निवकणे साखरी-चिटेघर व बीबी या ठिकाणी लघुपाटबंधारे प्रकल्पाची कामे हाती घेतली. मात्र निधीअभावी तर कधी प्रकल्पग्रस्तांच्या मोबदल्यासाठी ही कामे रेंगाळली. यामुळे या विभागातील जनतेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याला पर्याय म्हणून केरा नदीवर कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधण्याची संकल्पना पुढे आली. याच हेतूने गतवर्षी केरळ ता. पाटण या ठिकाणी जलसंपदा विभाग सातारा यांच्या पुढाकाराने कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचे काम हाती घेण्यात आले.
67 लाख 30 हजार एवढ्या रकमेचे असणारे काम बारा महिन्यात कृष्णा खोरे प्रकल्पाच्या अभियंत्यानी पूर्ण केले आहे. अतिशय चांगल्या दर्जाचे झालेले काम व यामुळे झालेला पाणीसाठा शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे. या परिसरातील 98 हेक्टर शेती ओलिताखाली येऊन शेतकऱ्यांच्या शेतीला बारमाही पाणी मिळणार आहे. तर पाणी विकत घेण्याची वेळ येत असलेल्या केरळ गावाला पिण्याचे मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या विभागातील पाण्यापासून वंचित असणाऱ्या गावाला आता बारमाही पाणी मिळणार आहे.
सन 2000 साली निवकणे प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र अपुरा निधी व प्रकल्पग्रस्तांच्या समस्या त्यामुळे या कामाला अद्याप मुहूर्त मिळाला नाही. अजूनही या प्रकल्पाचे काम अपूर्ण आहे. यासाठी वेळोवेळी दैनिक “प्रभात’ने आवाज उठवून लोकप्रतिनिधी राजकीय नेते यांना विभागातील पाणीटंचाई व प्रकल्पाचे अपूर्ण काम याबाबत सातत्याने वस्तूस्थिती समोर मांडली होती. त्यामुळे या विभागाला पाणी मिळावे यासाठी येथील ग्रामस्थही आग्रही होते. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी केरा नदीवर टप्प्याटप्प्याने 7 कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधण्याचा जलसंपदा विभागाने निर्णय घेतला. त्या अनुषंगाने केरळ येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचे काम पूर्ण झाले असून पहिल्यांदाच या बंधाऱ्यात पाणी साठवले आहे. यामुळे दिवशी केरळ व मेढोंशी पर्यंत गावांना या पाण्याचा वापर करता येणार आहे. या बंधाऱ्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
अभियंत्यांचे कौतुक …
केरळ या ठिकाणी केरा नदीवर बांधण्यात आलेल्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचे काम गतवर्षी हाती घेण्यात आले. कोल्हापूर येथील ठेकेदार कंपनीने या कामाचे निविदा भरून काम चालू केले. तर बारा महिन्याच्या कालावधीत अत्यंत उत्कृष्ट पद्धतीचे काम कंपनीकडून करून घेण्याचे कसब जलसंपदा विभागाच्या अभियंत्यांनी दाखवले त्यामुळे या अभियंत्यांचे कौतुक विभागात होत आहे.
निवकणे प्रकल्पालाही मुहूर्त मिळावा…
केरा नदीवर बांधण्यात येत असलेल्या निवकणे प्रकल्पालाही लवकर मुहुर्त मिळावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. केरळ ते निवकणे याठिकाणी कोल्हापूर पद्धतीचे सात बंधारे बांधण्यात येणार आहेत. मात्र, त्यासाठी प्रकल्पाचे काम पूर्ण होऊन धरणात पाणीसाठा होणे आवश्यक आहे. त्यामुळे निवकणे धरणाचे काम हाती घेण्यात यावे, अशी अपेक्षा शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.