मुंबई – भारतीय क्रिकेटपटूंना दुखापती झाल्यानंतर त्यांना तंदुरुस्तीसाठी एनसीएमध्ये (राष्ट्रीय क्रिकेट अकादमी) जावे लागते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून अकादमीच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अकादमीचे संचालक व माजी कर्णधार राहुल द्रविडनेच आता त्यात लक्ष घालावे व तेथील सर्व जबाबदारी आपल्या हाती घ्यावी, अशी अपेक्षा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) केली आहे. सध्याच्या कार्यपद्धतीवर देखील मंडळाने नाराजी व्यक्त केली आहे.
न्यूझीलंड दौऱ्यात भारतीय खेळाडूंना तसेच त्यापूर्वी मायदेशात झालेल्या काही मालिकांमधून दुखापतीने माघार घ्यावी लागली होती. त्यांना अकादमीत तंदुरुस्तीसाठी जावे लागले होते, मात्र संघात परतल्यानंतरही ते पूर्ण तंदुरुस्त नाहीत असे आढळून आले होते. या खेळाडूंबाबत अकादमी गंभीर नाही अशीच टीका होत होती. हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि ईशांत शर्मा यांच्या तंदुरुस्तीबाबत अत्यंत हलगर्जीपणा झाल्याचे उघड झाल्याने मंडळाने नाराजी व्यक्त करताना द्रविडनेच यात लक्ष घालावे व कार्यपद्धतीत पारदर्शकता आणावी अशी अपेक्षा केली आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत इशांत सहभागी झाला होता, मात्र पहिल्या कसोटीनंतर त्याला पुन्हा दुखापतीच्या कारणाने दुसऱ्या कसोटीतून माघार घ्यावी लागली. ईशांत जर पूर्ण तंदुरुस्त नव्हता तर ते अकादमीने स्पष्ट का केले नाही अशीही विचारणा मंडळाने केली आहे.
द्रविड हा महान खेळाडू आहे यात शंका नाही पण अकादमीतील कामकाज कसे असावे हे त्याला लक्षात आले पाहिजे. तसेच हे कामकाज अत्यंत पारदर्शक व्हावे यासाठी त्याने आग्रही असले पाहिजे. अकादमीतील दैनंदिन कामकाज कसे चालते व यावरही अंकुश ठेवणे आवश्यक आहे, असेही मंडळाने स्पष्ट केले आहे.