औरंगाबाद येथील चिखलठाणा येथील औरंगाबाद विमानतळाचे नामकरण करण्यात आले असून हे विमानतळ आता छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असे करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत ही घोषणा केली. त्याचप्रमाणे औरंगाबाद महानगरपालिकेने देखील धर्मवीर राजे संभाजी भोसले विमानतळ’ असे नाव करण्याबाबत ठराव संमत केला आहे.
तसेच लोकसभेतही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. त्याप्रमाणे मंत्रिमंडळाने या प्रस्तावास मान्यता दिली असून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांची मान्यता घेऊन केंद्र शासनाच्या नागरी विमान मंत्रालयाकडे तो पाठविण्यात येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
सीएए, एनपीआरसाठी सहा मंत्र्यांची समिती
सीएए, एनपीआरवरून जनतेमध्ये असंमजसाची भावना आहे. राज्य सरकारने याबाबत काय भूमिका घ्यायची यासाठी सहा मंत्र्यांची समिती नेमण्यात आली आहे. सीएए,एनपीआर या मुद्द्यांचा अभ्यास करण्यासाठी तिन्ही पक्षाच्या ज्येष्ठ सदस्यांची एक समिती स्थापन करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी आधीच केली होती.
त्यानुसार ही समिती स्थापन करण्यात आली आहे. संसदीय कामकाज मंत्री ऍड.अनिल परब या समितीचे अध्यक्ष असणार आहेत.
या समितीमध्ये जितेंद्र आव्हाड, विजय वडेट्टीवार, सुनिल केदार, नवाब मलिक आणि उदय सामंत या मंत्र्यांचा यात समावेश असणार आहे. सरकारने निश्चित काय भूमिका घ्यायची याबाबत ही समिती सरकारला शिफारस करणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.