लस तयार करण्यासाठी प्रयत्न जारी
नवी दिल्ली : चिकन, मटण किंवा मासे खाल्ल्यामुळे करुणा व्हायरस पसरत असल्याचा कसलाही वैज्ञानिक पुरावा नाही. त्याचबरोबर भारतातील सध्याचे तापमान पाहता हा व्हायरस हवेत जास्त काळ धरू शकत नाही असे अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे.
सध्या भारतामध्ये चिकन खाल्ल्यामुळे व्हायरस पसरण्याची शक्यता असते अशा अफवा पसरलेल्या आहेत. त्यामुळे पोल्ट्री उद्योगाचे नुकसान होत असल्याचे वृत्त आहे. याबाबत स्पष्टीकरण करताना प्राधिकरणाने म्हटले आहे की, जागतिक पातळीवर ज्येष्ठ वैज्ञानिक या विषयावर काम करीत आहेत.
त्यांच्याकडून मटण किंवा चिकन खाल्ल्यामुळे करून व्हायरस पसरत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आपण त्यावर विश्वास ठेवायला हरकत नाही.
त्याचबरोबर भारतातील तापमान बरेच जास्त असते त्यामुळे हा व्हायरस वातावरणात जास्त काळ राहू शकत नाही असे प्राधिकरणाचे अध्यक्ष जी एस जी आयंगर यांनी सांगितले. ते म्हणाले की, मी स्वतः शास्त्रज्ञ आहे आणि चिकन खाल्ल्यामुळे करोना व्हायरसचा संसर्ग होतो हा युक्तिवाद मी मान्य करू शकत नाही.
मात्र तरीही परिस्थितीपूर्व खबरदारीची उपाययोजना म्हणून प्राधिकरणाने देशभरातील चिकन मार्केट मधील स्वच्छतेचा आढावा घेण्याचे काम सुरू केले असून या क्षेत्रातील उद्योजकांना याबाबत सावध राहण्यास सांगितले आहे.
भारतामध्ये वैद्यकीय शास्त्र पुढारलेले आहे. या अगोदर अनेक व्हायरसवर लस भारतामध्ये कमीत कमी वेळात तयार झालेली आहे.
करोना व्हायरसवरही लस तयार करण्याचे काम अनेक जण करीत आहेत. त्यामुळे सर्वांनी धीर धरून या प्रसंगाला संयमाने सामोरे जायची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान देशातील पोल्ट्रीचे दर कमी झाल्यामुळे पोल्ट्री उद्योगाने फेब्रुवारी महिन्यात 1750 कोटी रुपयांचा तोटा झाला असल्याचे म्हटले आहे आणि सरकारकडून मदतीची मागणी केली आहे.