पुणे – या आठवड्यात भारतातील काही शहरात करोना व्हायरसची लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे या व्हायरसचा प्रादुर्भाव पसरू नये यासाठी सरकार उपाययोजना करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून या व्हायरसचा संसर्ग झालेल्या रुग्नावर उपचार होऊ शकतील अशा औषधाच्या निर्यातीवर निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
त्यामध्ये कच्च्या मालातील 26 प्रकार, काही अँटिबायोटिक्स विटामिन्सचा समावेश असल्याचे सांगण्यात आले. त्या निर्णयाची ताबडतोब अंमलबजावणी सुरू झाली आहे. भारतात जर या रोगाचा प्रादुर्भाव वाढला तर औषधाची कमतरता भासू नये याकरिता हा निर्णय घेण्यात आला आहे. भारतातील बऱ्याच औषधासाठी कच्चामाल चीनमधून आयात केला जातो. मात्र चीनमध्ये मोठ्या प्रमाणात हा व्हायरस पसरल्यामुळे या आयातीवर परिणाम झालेला आहे.
परकीय व्यापार महा संचालनालयाने जारी केलेल्या पत्रकात कोणत्या औषधाच्या निर्यातीवर निर्बध घालण्यात आले आहेत त्याची यादी देण्यता आली आहे. औषधी विभागाने यासंबंधात एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली होती. या समितीने केलेल्या शिफारशीनुसार या उत्पादनाच्या निर्यातीवर मर्यादा आणण्यात आल्या असल्याचे सांगण्यात आले. देशातील आणि जागतिक परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. बऱ्याच देशांमध्ये करानाचे रुग्ण आढळून आल्यामुळे आयात निर्यातीवर आगामी काळात बराच परिणाम होण्याची शक्यता आहे.