पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांची कारवाई
पोलिसांनी 11 जणांना ताब्यात घेत बाहेर दिले सोडून
बारामती (प्रतिनिधी) -खंडणीसह मारामारी, सरकारी नोकरास मारहाण, चोरी असे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या 15 जणांना पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूर, पुरंदर व दौंड तर सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातून हद्दपार करण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी याबाबतचा आदेश नुकताच काढला आहे. या 15 जणांपैकी 11 जणांना बारामती तालुका पोलिसांनी तडीपार केले असून उर्वरित चौघांना लवकरच बाहेर सोडण्यात येणार असल्याचे पोलीस ठाण्याचे निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांनी सांगितले.
तडीपार झालेले सर्वजण शिर्सुफळ (ता. बारामती) येथील रहिवासी आहेत. या आरोपींनी आर्थिक फायद्यासाठी टोळी तयार केली होती. त्या माध्यमातून दहशत निर्माण करणे, सरकारी नोकरास मारहाण, गर्दी मारामारीसह खंडणी, चोरी, शारिरिक दुखापती असे गुन्हे त्यांनी केले होते. टोळीप्रमुख दत्तात्रय आटोळे याने वाळूचोरी करणाऱ्या गुन्हेगारांची टोळी तयार करत वाळू व्यवसायात शासकीय नोकरदारांनी आडकाठी आणल्यास त्यांना दमदाटी, धाकदपटशा, प्रसंगी मारहाण केली होती. या टोळीत अनेक बेरोजगार युवक सहज मिळणाऱ्या पैशांमुळे सहभागी झाले होते. त्यामुळे त्यांना तडीपार करावे, असा अहवाल तत्कालीन पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी जिल्हा पोलीस अधिक्षकांना पाठवला होता.
पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांची नियुक्ती केली होती. त्यांनी प्रस्तावित हद्दपार यांचे लेखी म्हणणे घेत आपला चौकशी अहवाल पोलीस अधीक्षकांना सादर केला होता. या आरोपींविरोधात बारामती तालुका पोलीस ठाण्यासह अन्य ठिकाणी अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याची दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी 15 जणांना तीन महिन्यांसाठी तडीपार केले. तडीपार केलेल्यांपैकी 11 जणांना पोलिसांनी ताब्यात घेत बाहेर सोडून दिले आहे. अन्य चौघांबाबतची प्रक्रिया सुरू असल्याचे घोलप यांनी सांगितले.
यांना केले तडीपार
तडीपार झालेल्यांमध्ये टोळीप्रमुख दत्तात्रय गणपत आटोळे (वय 28), गणेश सुरेश गाढवे (वय 26), विठ्ठल सुरेश गाढवे (वय 26), विशाल बापूराव गावडे (वय 28), ललित बापूराव रांधवण (वय 27), आबा उर्फ जगन्नाथ शिवाजी देवकाते (वय 32), विजय मल्हारी आटोळे (वय 43), पांडुरंग किसन झगडे (वय 50), सचिन एकनाथ आटोळे (वय 35), केशव गोपिचंद आटोळे (वय 32), अजित किसन आटोळे (वय 20), सागर बापू झगडे (वय 30), पोपट दत्तू देवकाते (वय 35), गणेश पांडुरंग हिवरकर (वय 27) व आप्पा बबन झगडे (वय 29) यांचा समावेश आहे. त्यांना पुढील तीन महिन्यांसाठी पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूर, पुरंदर व दौंड, सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस व सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातून तडीपार करण्यात आले.