देहूरोड – बीज सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर तीर्थक्षेत्र देहू परिसरात असणाऱ्या विविध खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या व्यावसायिकांची तपासणी करण्याची मागणी श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने करण्यात येत आहे.
तीर्थक्षेत्र देहू येथे बुधवारी (दि. 11) श्री संत तुकाराम महाराज वैकुंठगमन सोहळा अर्थात बीज सोहळा संपन्न होणार आहे. या सोहळ्यासाठी राज्यभरातून सुमारे पाच लाख भाविक येत असतात. परिसरातील हॉटेल, स्वीट होम, अमृततुल्य, केकहोम, बेकरी, दूध डेअरी, चायनीज सेंटर, फूड मॉल, ज्युस सेंटर, रसवंतीगृह, आईस्क्रीम पार्लर, पाणीपुरी, वडापाव, भजीच्या हातगाड्यांसह विविध खाद्य पदार्थांची दुकाने आहेत.
तसेच ऐनवेळी यात्रेमध्ये अनेक विविध खाद्यपदार्थांच दुकाने व विविध स्टॉल उभारण्यात येतात. अनेकांकडे अन्न व औषध प्रशासनांचे परवाना नसतात. तसेच अस्वच्छ पाणी, खाद्यतेल अथवा अस्वच्छतेमुळे भाविकांना विषबाधा होऊन कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी सुरक्षिततेच्या दृष्टीने अशा व्यावसायिकांची अन्न व औषध प्रशासन आणि प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने तपासणी करण्यात यावी, अशा व्यवसायांमुळे एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी बीज सोहळ्यात खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या व्यावसायिकांनी स्वच्छ, ताजे खाद्यपदार्थ यासह स्वच्छतेची काळजी घ्यावी, असे आवाहनही संस्थानचे अध्यक्ष मधुकर महाराज मोरे, विश्वस्त संजय महाराज मोरे, विशाल महाराज मोरे, अजित महाराज मोरे, संतोष महाराज मोरे, काशिनाथ महाराज मोरे, माणिक महाराज मोरे यांनी केले आहे.
जगद्गुरू संत तुकाराम महाराज बीज सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यापार्श्वभूमीवर संत तुकाराम महराज देवस्थानच्या वतीने विविध कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. तसेच ग्रामपंचायतीकडूनही रस्ते, पाणी, आरोग्य, वीज आदी कामे हाती घेतली आहेत. भाविकांना सुविधा देण्यासाठी प्रशासकीय कामांनाही गती आली आहे.
संत तुकाराम महाराज बीज सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देहूतील सर्व खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या स्टॉल्स्, दुकानांची तपासणी मोहीम लवकरच हाती घेतली जाईल.
– संतोष सावंत, सुरक्षा अधिकारी, अन्न व औषध प्रशासन.