पुणे – भामा आसखेड प्रकल्प बाधितांच्या प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी पालकमंत्री अजित पवार, आमदार दिलीप मोहिते पाटील आणि मी स्वतः योग्य समन्वय साधून प्रयत्न करीत आहोत. या प्रयत्नांना यश मिळत आहे. योजनेचे काम लवकरच सुरू होईल. त्यानंतर काम पूर्ण करून सहा महिन्यांत पुणेकरांना पाणी मिळेल, असा विश्वास शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी गुरूवारी व्यक्त केला.
पुणे येथे पत्रकार परिषदेत डॉ. कोल्हे यांनी माहिती दिली. शहराची जशी पाण्याची मागणी आहे. तशी भामा आसखेड प्रकल्प बाधितांच्याही काही मागण्या आहेत. शेतकऱ्यांशी संवाद साधून समन्वयाने हे प्रश्न सोडवण्याचे काम करीत आहोत. याला यश मिळाले आहे.
लवकरच काम सुरू होईल, आणि ते पूर्णही होईल, आणि सहा महिन्यांत शहराच्या पूर्व भागाला योजनेचे पाणी मिळेल, असे आश्वासन डॉ. कोल्हे यांनी दिले. दुदैवी धोरण आणि तत्कालीन लोकप्रतिनिधींची भूमिका यामुळे खेडमध्ये होऊ घातलेले विमानतळ दुसरीकडे गेले आहे. खरे तर चाकण एमआयडीसीचा विचार करता या परिसरात किमान डोमेस्टिक तरी विमानतळ होणे गरजेचे आहे. यासंबंधी मी यापूर्वीच संसदेत बोललो आहे, असे डॉ. कोल्हे यांनी नमूद केले.