सिलिंडरचे दर आवाक्याबाहेर गेल्याने ग्रामीण भागात घरोघरी चुली पेटल्या
वालचंदनगर – महिलांना धुरापासून मुक्ती व सन्मान देणाऱ्या पंतप्रधान उज्ज्वला योजनेमुळे ग्रामीण भागातही घरगुती गॅस सिलिंडर सुलभ झाला होता. परंतु नुकत्याच झालेल्या दरवाढीमुळे ही सेवा गरिबांसाठी डोकेदुखी ठरली आहे. त्यामुळे पुन्हा गावोगावी चुली पेटल्या जात आहेत.
केंद्रात भाजप सत्तेवर येताच सरकारने महिलांचे आरोग्य, धुरमुक्त स्वयंपाकघर व पर्यावरण पुरक वातावरणासाठी उज्ज्वला योजना सुरू केली. यामुळे काबाडकष्ट करणाऱ्या ग्रामीण भागातील महिलांसाठी ही योजना आशेचा किरण ठरली होती. मात्र, सिलिंडरच्या दरात सतत वाढ होत गेली. तर नुकतीच तब्बल 145 रुपयांची वाढ झाल्याने गृहीणी तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत.
गेल्या पाच वर्षांत अनुदानित सिलिंडरचे दर जवापास दुप्पटीने वाढले आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांच्या खिशाचे अर्थकारण बिघडले आहे. सिलिंडरचे भाव आवाक्या बाहेर गेल्याने अनेक घरातील गॅस शेगडीसह उज्ज्वला योजनेचा संपूर्ण संच गुंडाळून ठेवले असल्याने स्वयंपाक घरातून पुन्हा धूर निघू लागला आहे. त्यामुळे सरपण गोळा करण्यासाठी धडपड करावी लागते आहे. दरवाढीमुळे धुरमुक्त स्वयंपाक घर केवळ स्वप्न
ठरत आहे.
शासनाने गरिब सर्व सामान्यांचा विचार करून गॅसच्या किंमतीसह महागाईवर नियंत्रण आणावे अशी मागणी ग्रामीण भागातून पुढे
येत आहे.
उज्ज्वला योजनेतील लाभार्थी महिलांना गॅस जोडणी मिळाल्याने या कुटूंबाना केरोसीन विक्रेत्यांनी पुरवठा बंद केला आहे. आता सिलिंडर खरेदी करणे परवडत नसल्यामुळे महिलांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. यामुळे ग्रामीण भागात महिलांची सरपण गोळा करण्यासाठी पुन्हा धडपड सुरू झाली आहे. दिवसभर पारंपरिक रान गोवऱ्या, लाकडे, तूराट्या गोळा करण्यात या महिला वणवण भटकत आहेत.
– अमरसिंह निंबाळकर, व्यापारी
आधीच दररोजच्या वापरातील वस्तू महाग होत आहेत. सरकारने गॅसजोड दिल्यावर पाणी तापवण्यासह सगळा चुलीवरचा स्वयंपाक बंद करून गॅसवर करत होतो; परंतु सिलिंडरचे वाढते दर तसेच सबसिडीची रक्कम देखील वेळेत मिळत नाही. त्यामुळे सिलिंडर संपले की पुन्हा चुल पेटविण्या शिवाय पर्याय नाही.
– यशोदा राजपूत, गृहिणी, वालचंदनगर
मंदी, कामगार पगार, इतर साहित्य खर्चाला तोंड देवून कसा बसा व्यवसाय सुरू असतानाच गॅसच्या दरवाढीमुळे ग्रामीण भागात व्यवसाय कसा करायचा असा प्रश्न पडला आहे. सरकारने दरवाढ कमी करावी अशी कळकळीची विनंती आहे.
– विजय कांबळे, व्यापारी
गोरगरिब कुटुंबाला गॅस सिलिंडरच्या दरातील 145 रूपयांची वाढ परवडणारी नाही. आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे गॅसऐवजी चुलीचा वापर सुरू आहे. जेव्हा सिलिंडरचे दर कमी होतील तेव्हाच गॅस शेगडी चालू करणार आहे.
– पूजा पवार, गृहिणी