महाशिवरात्री हा आपल्याकडे मोठा सण मानला जातो. शंकराची पूजा आणि तो पावण्यासाठी करण्यात येणारा उपवास हे अगदी समीकरणच झालेले असते; एकादशी आणि चतुर्थीलाही उपवास केला जातो. काही वारही पाळले जातात; परंतु उपवास करत असताना आरोग्याला कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक असते. यातही मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, ऍसिडिटी, पोटाचे विकार यांसारख्या समस्या असणाऱ्यांनी विशेष काळजी घेणे आवश्यक असते. अन्यथा देवाच्या श्रद्धेपोटी केलेला उपवास वेगळ्याच समस्या निर्माण करू शकतो. त्यासाठी खालील गोष्टींची आवर्जून काळजी घ्यायला हवी.
- गर्भवती महिला, दिवसभर कष्टाचे काम करणारे लोक, ज्येष्ठ व्यक्ती, मधुमेह किंवा इतर आरोग्याच्या समस्या असणाऱ्या व्यक्तींनी उपवास करणे टाळावे.
- उपवास केला तरी तो योग्य पद्धतीने करायला हरकत नाही. निरंकारी किंवा निर्जल उपवास करणे टाळावे, त्यामुळे आरोग्याला त्रास होण्याची शक्यता असते.
- केवळ पाणी पिऊन उपवास किंवा केवळ फळे खाऊन उपवास असे प्रयोग अनेक जण करताना दिसतात. मात्र, त्याचा आरोग्याला त्रास होऊ शकतो.
- उपवासाला आपल्याकडे प्रामुख्याने साबुदाणा खाल्ला जातो. साबुदाणा प्रमाणात खाल्ल्यास अपाय होत नाही. मात्र, प्रमाणापेक्षा जास्त साबुदाणा खाल्ल्यास त्याचे शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतात. साबुदाणा हा पिष्टमय पदार्थ असल्याने तसेच तो पचायला काही प्रमाणात जड असल्याने शक्य असल्यास साबुदाणा खाणे टाळावे.
- दाणे हा पित्तासाठी कारणीभूत ठरणारा घटक आहे. उपवासाच्या अनेक पदार्थांमध्ये दाणे प्रामुख्याने वापरले जातात. मात्र, दाण्यांमुळे अनेकांना पित्त होऊ शकते, तसेच दाण्यांमध्ये कॅलरीजचे प्रमाणही जास्त असते. त्यामुळे दाणे खाताना काळजी घ्यायला हवी.
- उन्हाळ्यात उपवासाच्या दिवशी ताक, कोकम सरबत, लिंबू सरबत, उसाचा रस, शहाळे, नीरा अशी पेये आवर्जून घ्यावीत. त्यामुळे ऊर्जा टिकून राहण्यास मदत होते.
- रताळे, फळे, राजगिरा, सुकामेवा, खजूर, दही, ताक, दूध हे उपवासाला चालणारे काही आरोग्यदायी पदार्थ आहेत, त्यांचा आहारात जरूर समावेश करावा.
- उपवासाच्या दिवशी तेलकट पदार्थ खाल्ले जाण्याची शक्यता असते. मात्र, तसे करणे टाळावे. विशेषत: बाहेरचे अन्नपदार्थ खाताना विक्रेत्यांनी कोणत्या प्रकारचे तेल वापरले आहे हे सांगता येत नाही. त्यामुळे बाहेरचे अन्नपदार्थ आणि तेलकट पदार्थ टाळलेले केव्हाही चांगले.