नगर – शहरात महापालिकेच्यावतीने रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्याचे काम सध्या सुरू असून त्याच रस्त्यांवर खड्ड्यांचे पुन्हा पुन्हा पॅचिंग केले जात असल्याने या कामाबाबत संशय निर्माण झाला आहे. सात महिन्यात तीन निविदा काढून तीच तीच कामे केली जात असल्याने यामधील मोठा आर्थिक घोटाळा करण्यात येत असल्याचा आरोप मनसेच्यावतीने करण्यात आला आहे.
मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, नितीन भुतारे, विनोद काकडे, मनोज राऊत, रतन गाडळकर, गणेश शिंदे, गणेश मराठे, अंबादास गोटीपामूल, अभिनव गायकवाड आदींनी रस्त्याच्या पॅचिंगच्या सुरू असलेल्या कामाची पाहणी करुन निदर्शने केली.
यावेळी बोलताना नितीन भुतारे म्हणाले, महापालिकेने रिलायन्स कंपनीच्यावतीने केबल टाकण्यासाठी रस्ते खोदाई केल्याने त्या रस्त्यांचे पॅचिंग करण्यासाठी महापालिकेला निधी दिला होता. त्या निधीतून रस्ते पॅचिंगसाठी 24 लाख रुपयांची निविदा काढण्यात आली.
या निविदेनुसार शहरातील व उपनगरातील 20 रस्त्यांचे पॅचिंगचे काम पूर्ण करण्यात आले. त्याबाबतचा काम पूर्णत्वाचा दाखला 2 सप्टेबर 2019 रोजी देण्यात येवून बिलही काढण्यात आले. त्यानंतर पुन्हा 36 लाख व 22 लाख अशा दोन वेगवेगळ्या निविदा काढण्यात आल्या आहेत.
या निविदांमधूनही पूर्वी पॅचिंग केलेल्या रस्त्यांचेच पॅचिंगचे काम सध्या सुरू आहे. एकदा पॅचिंग केलेल्या रस्त्याच्या दोष दायित्वाची मुदत 24 महिने असताना पुन्हा अवघ्या 6 महिन्यातच पॅचिंग कसे केले जात आहे? याचाच अर्थ सहा महिन्यापूर्वी केलेले काम निकृष्ट दर्जाचे असावे किंवा काही ठिकाणी कामच न करता बिल काढले असावे, अशी शक्यता आहे.
महापालिकेतील अधिकारी व ठेकेदार हे संगनमताने नागरिकांच्या कररुपी पैशावर डल्ला मारत असून याबाबत माहितीच्या अधिकारात प्राप्त झालेल्या माहितीनुसार थेट नाशिक विभागीय आयुक्तांकडे तक्रार करण्यात येणार असल्याचे भुतारे यांनी सांगितले. तसेच नागरिकांच्या पैशाच्या केल्या जात असलेल्या गैरवापराविरोधात मनसेच्यावतीने तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येणार असल्याचे डफळ यांनी सांगितले. याबाबत महापालिकेने तातडीने दाखल घेवून कामाची पाहणी करावी अशी मागणी केली आहे.