कर्जमाफीबाबत माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांना इंदापूर राष्ट्रवादीचे निवेदन
रेडा -केंद्र व राज्य सरकारने केलेल्या तारखांच्या घोळामुळे, राज्यातील बहुतेक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले आहेत. यामध्ये केंद्र शासन कृषी कर्जमाफी व थकीत कर्ज सहाय्य योजना 2008 तसेच महाराष्ट्र शासन कृषी कर्जमाफी व कर्ज सवलत योजना 2009, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 व महात्मा फुले कर्जमुक्ती योजना 2019 या योजनांच्या तारखेच्या घोळामुळे,खरा शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिला आहे.
या शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली पाहिजे, अशी मागणी इंदापूर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने तालुकाध्यक्ष महारुद्र पाटील व कार्याध्यक्ष अमोल भिसे यांनी माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्याकडे मुंबई येथे निवेदनाद्वारे केली आहे.
राज्य व केंद्र शासनाच्या चुकीच्या तारखांच्या घोळामुळे शेतकरी कर्जमाफी पासून वंचित राहिले आहेत. शेतकरी 2008 पूर्वी थकित दिसतात त्यामुळे ग्रामीण भागात असणाऱ्या विकास संस्थेवर विनाकारण बोजा पडलेला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा कणा असणाऱ्या विविध विकास सोसायट्या तोट्यात दिसतात.
2004 पूर्वी कर्जाचे पुनर्गठन झालेले होते ते शेतकरी या कोणत्याही कर्जमाफीत बसलेले नाहीत. त्यामुळे तारखांचा अडथळा न करता, सरसकट दोन लाख रुपये कर्ज माफी मिळावी, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा कणा म्हणून कार्यरत असणाऱ्या विविध कार्यकारी सेवा संस्थांना याचा फायदा होईल, तसेच तोट्यात गेलेल्या विकास संस्थाचा विकास होऊन त्या चांगल्या चालतील.
कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळेल असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या निवेदनाची तात्काळ दखल शरद पवार यांनी घेतली असून सहकारमंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री यांना यासंदर्भात शरद पवार यांनी सूचना केल्या आहेत.