नगर – शाळकरी विद्यार्थ्यांच्या पाठीवर दिवसेंदिवस दप्तरांचे ओझे वाढतच चालले आहे. माध्यमिक व प्राथमिक शिक्षण विभागाकडून शाळा व विद्यालयस्तरावर दप्तराचे ओझे कमी करण्याची अंमलबजावणी होत नाही. याबाबत प्राथमिक शिक्षण संचालनालयाने कडक पाऊल उचलले असून याबाबतचा अहवाल सादर करण्याचा फतवा शिक्षणाधिकाऱ्यांना काढला आहे.
दिवसेंदिवस स्पर्धात्मक युगामुळे शालेय अभ्यासक्रमात वारंवार बदलत आहेत. या शिवाय शाळांमध्ये दररोज विविध उपक्रम राबविले जात आहेत. पाठ्यपुस्तकांसोबत इतर अभ्यासक्रमांची पुस्तके, वह्या, कंपासपेटी, जेवणाचा डबा व पाण्याची बाटली या वस्तुंमुळे विद्यार्थ्यांचे दप्तर तुुडुंब भरले जाते. भरलेले दप्तर पाठीवर लादल्यामुळे विद्यार्थ्यांना पाठ व मानदुखीसारखे गंभीर आजार लहानपणापासून बळावत चालले असल्याचे निरीक्षण शिक्षणतज्ज्ञांनी नोंदविले आहे. त्यामुळे राज्य शासनाने विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांच्या वजनाच्या 10 टक्के वजन दप्तराचे असायला पाहिजे, असा आदेश काढला असला तरी अनेक माध्यमिक व प्राथमिक शाळांमध्ये या नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शासन आदेश फक्त कागदावरच राहिला असल्याचे चित्र ठिकठिकाणी पहावयास मिळत आहे.
अनेक शालेय विद्यार्थी पाठीवरील दप्तराच्या ओझ्यामुळे दररोज वाकलेले दिसत आहेत. याकडे शाळा प्रशासनाचेही दुर्लक्ष होत आहे. राज्याच्या प्राथमिक शिक्षण संचालनालयाने जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना दप्तराचे ओझे कमी करण्याबाबत सुनावले आहे. शासन निर्णय व परिपत्रकाची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी तसेच शाळा स्तरावर करण्यात आलेल्या कार्यवाहीचा अहवाल प्राथमिक शिक्षण संचालनालयास सादर करण्यात यावा, असे आदेश प्राथमिकचे शिक्षण संचालक द. गो. जगताप यांनी दिले आहेत. या आदेशामुळे शिक्षण विभाग खडबडून जागा झाला आहे.
प्राथमिक शिक्षण संचालनालयाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती गटशिक्षणाधिकाऱ्यांना विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्याबाबतच्या पत्रकाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यास सांगितले आहे. केलेल्या कार्यवाहीचा अहवाल कार्यालयास सादर करावा, अशा सूचनाही दिल्या आहेत.
रमाकांत काटमोरे , शिक्षणाधिकारी