मुंबई: “महाराष्ट्राच्या सामान्य शेतकऱ्याच्या हक्काचे पाणी शरद पवारांच्या वावरात. सुप्रिया ताईंच्या १० एकरात पिकणाऱ्या ११३ कोटीच्या वांग्यांना सरकारी हातभार!”, अशी टीका भाजपने केली आहे. निरा-देवघर व गुंजवणी धरणाचे कालवे कार्यान्वित नसल्यामुळे विना वापर राहणारे पाणी समन्यायी तत्वावर तात्पुरत्या स्वरुपात निरा उजवा आणि डावा कालवा येथील लाभक्षेत्रास वाटप करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. फडणवीस सरकारच्या काळात निराचे पाणी थांबवण्यात आले होते.
दरम्यान आता पाण्यावरून पुन्हा राजकारण तापण्याची चिन्हे दिसत आहेत. भाजप खासदार रणजितसिंह निंबाळकर ठाकरे सरकारच्या निर्णयाविरोधात आंदोलन करणार आहेत. नीरा देवधर आणि गुंजवणी धरणाचे ५५ टक्के पाणी डावा कालवा येथील लाभक्षेत्रास वाटप करण्याच्या निर्णयाविरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचे सुद्धा निंबाळकर म्हणाले.
निरा देवघर धरणाचे काम 2007 मध्ये पूर्ण झाले असून 11.73 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा निर्माण झालेला आहे. गुंजवणी धरणात सन 2018 पासून 3.69 टीएमसी पाणीसाठा निर्मित झालेला होता. या दोन्ही प्रकल्पांच्या कालव्याची कामे अपूर्ण असल्याने त्यांच्या नियोजित लाभक्षेत्रात पाणी वापर होऊ शकत नाही. ही बाब विचारात घेऊन या पाण्याचा वापर होण्याच्या दृष्टीने या दोन्ही धरणात उपलब्ध होणारे मूळ प्रकल्पाची गरज भागल्यावर शिल्लक राहणारे पाणी निरा डावा कालवा व निरा उजवा कालवा यात समन्यायी तत्वावर वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला. हे वाटप निरा डावा कालवा 55 टक्के आणि निरा उजवा कालवा 45 टक्के असं राहील.