एल्गार परिषदेचा तपास केंद्रीय एजन्सीकडे दिल्यामुळे राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण होणार का? राज्यात समांतर तपास केला जाणार का? हिंमत असल्यास राज्यात निवडणुका घेण्याचे आव्हान स्वीकारले जाणार का? ह्यांनी राज्यात निवडणुका घेण्याचे आव्हान दिले; त्यांनी देशभरातच निवडणुका घ्या म्हटले. मग कोण जास्त हिंमतवाला? सरकार नक्की पाच वर्षे टिकेल का? नाही टिकले तर पर्यायी सरकार येईल की निवडणूक लागेल? निवडणूक झाली तर कुणाकुणाची आघाडी होईल? कुणाला अधिक जागा मिळतील? बहुमताचे सरकार येईल की अल्पमतातलं? कित्ती महत्त्वाचे प्रश्न आहेत ना? या प्रश्नांच्या उत्तरांचा पाठलाग सुरू करावा. सोशल मीडियावर धुरळा उडावा. वेळ कसा गेला कळू नये. उद्याची भ्रांत असू नये. आजचा दिवस आनंदात गेला ना? एवढंच पाहावं आणि बेदरकारपणे जगत राहावं. वेळ जाणं महत्त्वाचं. तो आप्तांसोबत, मित्रांसोबतच जायला हवा असं नाही. त्याची गरजच उरलेली नाही आता.
दिवस-रात्र ऑनलाइन राहावं… जाग आल्यापासून झोप येईपर्यंत! हळूहळू जाग आणि झोप यातला फरकही ओळखता येऊ नये, इतकं सगळं एकजीव होऊन जावं आणि ब्रह्मानंदी टाळी लागावी. ज्यांना फक्त चिंताच करता येते त्यांना ती खुशाल करू द्यावी. म्हणे डिजिटल व्यसनामुळे समाजाचं नुकसान होतंय! नवनवीन शब्द शोधून काढून भीती दाखवण्याचे उद्योग. कसलं आलंय डिजिटल व्यसन?
मानसोपचार तज्ज्ञ तर लोकांना घाबरवण्याच्या बाबतीत अगदी आघाडीवर असतात. त्यांनी तर आता “डिजिटल पॉयझन’ हा शब्द शोधून काढलाय. विषारी घटक असलेले पदार्थ सतत खात राहिल्यामुळे जसं शरीरात हळूहळू विष भिनतं, तसं डिजिटल विष समाजात भिनतंय म्हणे! त्यांचे निष्कर्ष कुठल्या सर्वेक्षणातून काढलेले असतात कोण जाणे! मतदान झाल्यानंतर “कुणाला मत दिलं? का दिलं?’ असे प्रश्न विचारणारे जसे आम्हाला किंवा आमच्या ओळखीच्या कुणालाच आजवर भेटलेले नाहीत, तसेच डिजिटल व्यसनाचा सर्व्हे करणारेही कधीच भेटलेले नाहीत. सबब ही संशोधनंसुद्धा एक्झिट पोलसारखीच असावीत, असं आम्हाला वाटू लागलंय.
यांच्या सर्वेक्षणानुसार म्हणे, दर चार व्यक्तींमागे एका व्यक्तीचा स्वभाव चिडचिडा झालाय. दर सहा व्यक्तींमागील एक व्यक्ती नैराश्याच्या समस्येनं ग्रासलीय. सातपैकी एक व्यक्ती डिजिटल लाइफस्टाइलमुळे मनोविकाराला बळी पडलीय. कुठून आकडेवारी आणतात हे लोक? विकासाचे, प्रगतीचे, तंत्रज्ञानाचे शत्रू प्रत्येक काळात समाजात कुठे ना कुठे दबा धरून बसलेले असतातच. काहीही नवीन आलं की लगेच आडवे येतात. जीवन अधिकाधिक सुखकर बनत चाललंय, तर ह्या मंडळींना बघवत नाही. डिजिटल लाइफस्टाइलचे असतीलच दुष्परिणाम तर सगळ्यांचं जे होईल तेच आमचं होईल!
परवा असाच आणखी एक सर्व्हे आला.
काय तर म्हणे परंपरागत नशेऐवजी आता पर्यायी नशापानाचं प्रमाण वाढतंय. पंक्चरचं सोल्यूशन, व्हाइटनर, थिनर, कफ सिरप, रंग, आयोडेक्स, फेविक्विक असले पदार्थ नशेसाठी वापरले जाताहेत. पोरं औषधं-इंजेक्शनांचीही नशा करताहेत. औषधांसाठी एकवेळ प्रिस्क्रिप्शन सक्तीचं करता येईल. आयोडेक्स आणि व्हाइटनरचं काय करणार? काहीतरी पुड्या सोडायच्या आणि मूळ मुद्द्यांवरून लक्ष विचलित करायचं. कसल्या या भलत्या नशा? सुरुवातीचे प्रश्न पाहा. ती खरी नशा!
-हिमांशू