मातापिता, गुरू ह्यांना आपल्या संस्कृतीने देवत्व बहाल करून त्यांच्या आदराची आणि पूजनाची आपल्याला शिकवण दिली आहे. त्याप्रमाणेच भर दुपारी दारी आलेल्या कोणाही भुकेल्या जीवास अतिथी मानून त्यास भोजन देऊन तृप्त करावे, हा गृहस्थाश्रमाचा एक नियमही घालून दिलेला आहे. दारी येणारा याचक हा “”जे जे भेटे भूत। ते ते मानिजे भगवंत।।” असे समजून त्याचा आदर सत्कार करावा. त्याची तहानभूक भागवावी हे आपल्याला अगदी पूर्वापार सांगत आणि शिकवत आलेले आहेत.
अतिथी धर्माचे पालन करीत असताना कोणास आणि किती मोठा ऐहिक आणि पारमार्थिक लाभ झाला ह्याच्या अनेक कथा आपल्या पोथी-पुराणात लिहून ठेवलेल्या आहेत. सती अनसूयेच्या दारी तिची सत्त्वपरीक्षा पाहण्यासाठी तिन्ही देवता अतिथी रूपाने आल्या. त्यांचे आतिथ्य करीत असताना त्या त्रिमूर्तींचाच दत्त अवतार कसा घडला ही कथा श्री गुरूचरित्र ग्रंथात नमूद आहेच. तसेच त्याच ग्रंथात दुपारी दारी आलेल्या दत्तगुरूंची भोजन इच्छा पुरवीत असताना विप्रदंपत्तीस झालेला घेवड्याच्या मुळा खालचा कनककुंभाचा लाभ हा त्या अतिथी पूजनाचे महत्त्व सांगण्यास पुरेसा आहे.
पूर्वीच्या काळी बराच मोठा विद्यार्थीवर्ग हा घरोघरी माधुकरी मागून विद्यार्जन करीत होता. तेव्हा त्यांना जेवू घालणे, भोजन देणे हे अतिथीधर्माचे पालन आवर्जून केले जात असे आजही साधारणपणे प्रत्येक घरात हा धर्म लहान मोठ्या प्रमाणात पाळला जातो.
या ठिकाणी संत कबिरांचे देवाकडे असलेले एक मागणे आठविल्याशिवाय राहात नाही. ते म्हणतात-
साई इतना दीजिए, जामें कुटुंब समाय।
मैं भी भुखा ना रहूँ, और साधू न भूखो जाय।।
म्हणजे काय तर हे प्रभू! तू मला इतके दे की त्यात मी आणि माझे कुटुंब ह्यांची गरज, भूक भागेल आणि कोणीही याचक हा माझ्या दारातून विन्मुख परत जाणार नाही.
खरंच हे असं अतिथी धर्माचं पालन आपण का करायचं? तर एक म्हणजे आपल्याला आपल्याबरोबरच दुसऱ्याची तहानभूक जाणून घेण्याएवढी सहृदयता आपल्यात यावी, आपल्या हातांना देण्याची सवय लागावी. प्रपंच करीत असताना हस्ते परहस्ते परमार्थ घडावा आणि अन्नदानाचे मोठे पुण्य पदरी पडावे. पूज्य संत गाडगेबाबांचा रोकडा धर्मही आपल्याला हीच शिकवण देतो ना?
– अरुण गोखले