नवी दिल्ली : देशातील बहुतांश सेलिब्रेटी किंवा दिग्गज लोक सोशल मीडियावर आहेत. रतन टाटा यांनीही नुकतेच इंस्टाग्रामवर पदार्पण केले आहे. अनेकदा ते आपल्या पोस्टच्या माध्यमातून सोशल मीडियावर चर्चेतही राहिले आहे.
यातच रतन टाटा यांनी नुकताच इंस्टाग्रामवर व्हिडियो शेअर केला आहे. हा व्हिडियो एका शालेय विद्यार्थ्यापासून सुरू होते. यात एक मुलगा वर्गमित्रांना आणि त्यांच्या पालकांना उद्देशून, ‘माझे बाबा देश चालवतात’, असे म्हणतो.
पुढे या व्हिडियोमध्ये लोकांना समजले नसल्याचे कळताच या चिमुरड्याने सांगितले की ”त्याचे वडील राजकारणी, डॉक्टर, पोलिस किंवा सैन्य सैनिक नाहीत. जर माझे बाबा कामावर गेले नाहीत तर भारतातील प्रत्येक घर थांबेल”. यानंतर व्हिडियोमध्ये असे दाखवण्यात आले आहे की, एक सफाई कामगार नाल्यामध्ये जाऊन साफसफाई करत आहे. यात मागे एका विद्यार्थी,कधीकधी असे वाटते की माझे बाबा आजारी पडतील. कधीकधी असे वाटते की माझे बाबा घरी परतणार नाहीत. माझ्या बाबांना वाचवा. माझ्या बाबांकडून हा देश चालवू नका, असे मन हेलवून टाकणारा संदेश देतो.
दरम्यान, हा व्हिडिओ टाटा ट्रस्टच्या मिशन गरिमाचा एक भाग आहे. टाटा ट्रस्ट्सचे अध्यक्ष रतन टाटा यांनी इन्स्टाग्रामवर शेअर करीत यावर त्यांनी, “मिशन गरिमा आमच्या शूर सफाई कामगारांसाठी”, असे कॅप्शन लिहिले आहे. ट्विटरवर ही जाहिरात शेअर करण्यात आल्यानंतर #TwoBinsLifeWins हॅशटॅग व्हायरल होत आहे.