आजच्या युवापिढीकडे इतिहास वाचण्याची आणि छत्रपती शिवरायांचे विचार अंगीकृत करण्याची विचारधारा क्षीण झाली आहे. संस्काराचे सूतोवाच नसलेली पिढी देशातील विविध गुन्हेगारी घटना पाहताना विकृती धारण करताना दिसत आहेत. राष्ट्रसंस्कृती टिकवायची असेल तर शिवचरित्राचा जागर केला पाहिजे. आज शिवजयंती साजरी होत आहे त्यानिमित्त…
देशात स्त्री अत्याचाराबाबत सतत वाईट घटना घडत आहेत. देशातील निर्भयाच्या साऱ्या घटना देशाच्या प्रतिमेला काळिमा फासणाऱ्या आहेत. छत्रपती शिवरायांनी स्वराज्यात शत्रूच्या स्त्रीशीसुद्धा कशी आदर्शवत वागणूक दिली, याची उदाहरणे अभ्यासली तर छत्रपती शासन, लोककल्याणकारी स्वराज्यव्यवस्थेचं आदर्श उदाहरण होय.
भारताच्या इतिहासातील हिंदवी स्वराज्य हे नवे पर्व होते. हिंदवी स्वराज्य उभे करताना छत्रपती शिवरायांनी मोठी विचारधारा व मॉं जिजाऊंचे संस्कार पेरले होते. त्यामुळे स्वराज्यात रयत सुखी होती. स्वराज्यातीलच काय पण शत्रूच्या गोटातील स्त्रीच्या केसाला धक्का लागणार नाही याची काळजी शिवरायांनी घेतली. स्वराज्यात आरमार उभे करताना आज्ञापत्रात महाराज लिहितात- “कदाचित एखादे झाड जे बहुत जीर्ण होऊन कामातून गेले असेल तरी त्याचे धन्यास राजी करून द्रव्य देऊन त्याचा संतोषे न्यावे.’ सुकलेले झाडसुद्धा रयतेच्या परवानगीशिवाय तोडता येत नव्हते त्या ठायी मातीशी आणि मातेशी बेईमानी करणाऱ्यांची गय केली जात नव्हती.
छत्रपतींनी केलेले न्यायनिवाडे नेहमी प्रबोधन म्हणून सांगितले जातात. पावणेचारशे वर्षांपूर्वी या हिंदुस्थानावर पाच पातशाह्या आपली जुलमी शासन सत्ता चालवित होत्या. त्यात छत्रपती शिवरायांनी निर्मिलेले हिंदवी स्वराज्य रयतेला आपले वाटत होते. कारण भाजीच्या देठापासून ते परस्त्रीच्या केसालाही धक्का लागत नव्हता. रांझे गावच्या पाटलाचा केलेला न्याय निवडा हा पुढे युगे युगे आदर्श ठरणारा आहे. रांझे गावच्या गुजर पाटलाने एका स्त्रीबरोबर केलेला बदअमल महाराजांना समजला त्यावेळी रांझे हे गाव आऊसाहेबांच्या देखरेखीतील होते. आऊसाहेबांकडे असलेल्या गावात हा गुन्हा म्हणजे महापाप. हा निवडा मात्र महाराजांनी केला. कारण राजे आता जाणते झाले होते. खटला बोलावून पाटलावरील आरोप सिद्ध झाला. त्वरित पाटीलकी जप्त करून त्याला कामावरून दूर केले. त्याला चौरंगी शिक्षा केली. अशा निवाड्याने हिंदवी स्वराज्य हे मोगलाईपेक्षा श्रेष्ठ आहे हे स्वराज्यातील रयतेच्या ध्यानी आले. रयतेवर हुकूम गाजवणारे पाटील, देशमुख, वतनदार ताळ्यावर आले. गुन्हेगारास शिक्षा देताना महाराज कठोर ठरले तरी मनाने मृदू होते. पुढे पाटलाची अपंग अवस्था पाहून त्यांना सांभाळण्याची सुद्धा सोय करून दिली.
स्वराज्य उभे करताना राज्यावर अनेक गोष्टींनी अर्थकारण थांबले होते. अशाच काळात एक खजिना कल्याणहून विजापूरकडे जात असल्याची खबर मिळाली. खजिना वाईजवळ तीनशे मावळ्यांनी लुटला. आता कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद चालून येणार म्हणून आबाजी सोनदेव या सुभेदारांवर जिम्मा सोपवला. “लावण्यवती स्त्री सापडली आहे. ती आपल्या सेवेस योग्य होईल’, असा अर्ज आबाजी सोनदेव यांनी केला. यात आबाजींचा स्वार्थ दडला होता.
महाराजांसमोर स्त्री हजर केल्यावर महाराज म्हणाले, “या स्त्रीसारखे आमच्या मातोश्रींचे रूप असते तर आमचेही रूप हिच्यासारखे झाले असते.’ हे ऐकून दरबारी मंडळींना शिवरायांचे स्त्रीविषयीचे धोरण समजले. आणलेली कल्याणच्या सुभेदाराची सून होती. त्यांनी चोळी बांगडी, वस्त्र अलंकार देऊन मोठ्या इतमामाने बोळवण केली. ही खरी शिवनीती होय. मध्ययुगीन कालखंडात स्त्रियांना दासी म्हणून गुलाम बनवले जात असे. स्त्री व देवदेवतांची विटंबना होत असे. स्त्री भेट म्हणून दिली जात असे व तहातही स्त्रियांची मागणी केली जाई. अशा काळात एक राजा स्त्री रक्षक बनतो. त्यांना मानसन्मान देतो. त्यांच्या प्रगतीचे धोरण आखतो त्यामुळे हिंदुस्थानावर मोगलांबरोबर इतर धर्मीय स्त्रियांत छत्रपतींविषयी आदर होता.
दक्षिण दिग्विजय करून स्वराज्याकडे परतत असताना कर्नाटक प्रांतात बेलदूर गावी एक किल्ला होता. किल्ल्याला वेढा घालून शिवरायांनी सखोजी गायकवाड यांच्याकडे सूत्र सोपवले. या किल्ल्याचा ठाणेदार पडल्यावर किल्ला हाती येईल असं वाटत असताना किल्लेदाराची पत्नी सावित्रीबाई देसाईने लढा दिला. अनेक स्त्रिया एकत्र येऊन पुरुषी वेशात लढत होत्या. अखेर त्यांची माघार झाली. स्त्रिया कैद करण्यात आल्या. तहाची बोलणी प्रसंगी शिवरायांना देसाईबाईंने सांगितलेल्या गैरवर्तनावरून मेहुण्याला हातपाय कलम करण्याची शिक्षा सुनावली. हा शिवरायांनी पाळलेला राजधर्म आहे. राजधर्मापुढे नाती, मैत्री नसून निःस्पृह न्याय असतो हे जगाला दाखवून दिले.
मोगलांच्या बाजूने उंब्रखिडीची लढाई लढणारी रायबाघीण पराभूत झाल्यावर पकडल्यावर तिला तिच्या हुद्द्यानुसार वागणूक देऊन तिला छावणीत सुखरूप पाठवले. प्रबळगडाचा किल्लेदार केसरीसिंह पडल्यावर त्याच्या आई, पत्नी व मुलांना सन्मानजनक वागणूक देऊन परत पाठवले. स्वराज्यातील पराक्रमी स्त्रियांचासुद्धा सन्मान केला. त्यातील एक म्हणजे हिरकणी. हिरा रोजच्याप्रमाणे रायगडावर दूध विकून परतत असताना किल्ल्याचे दरवाजे बंद झाले. जाण्याचे सारे मार्ग बंद झाले होते. हिरा अंधारात कडा काट्याकुट्यातून उतरून बाळासाठी घरी जाते. ही गोष्ट शिवरायांच्या कानी पडते. शिवरायांनी तिचा यथोचित सन्मान करून मातृप्रेमाचे प्रतीक म्हणून बुरुजाला हिरकणी बुरुज नाव दिले. ही शिवरायांची स्त्रियांविषयी असलेली मातृभक्ती होय.
– विठ्ठल वळसे पाटील