सिंधुदुर्ग : आकडा सांगण्यापेक्षा कृतीला महत्व देणारे आपले सरकार आहे. त्यामुळे आपणास जी कामे करायची त्याचे आराखडे सादर करा. निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही. गणपतीपुळेच नव्हे तर कोकणसह नवा महाराष्ट्र घडवायचे काम आपण सर्व जण मिळून करु, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
गणपतीपुळे येथील 102 कोटींच्या विकास आराखड्याचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. यानंतर झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, परिवहनमंत्री अनिल परब, पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक उपस्थित होते.
आजचा दिवस माझ्यासाठी तीर्थयात्रेचा दिवस आहे, असं सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधी वास्तूचा लोकार्पण सोहळा अर्थात शौर्यदिन साजरा करुन मी इथं आलो आणि येथून आंगणेवाडीला जाणार आहे. त्यामुळे एक पवित्र दिवस आज आहे असे मी मानतो. तसेच, मुंबईतही समुद्र आहे आणि कोकणातही पण कोकणातला समुद्र स्वच्छ व नितळ आहे. हे मी दुर्गांचे छायाचित्रण करताना बघितलय. इथल्या मातीतील माणसं ही अशीच निर्मळ आहेत. या कोकणचा विकास करताना निधी कधीच कमी पडू देणार नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
कोणत्याही ठिकाणचा विकास करताना तिथे स्वच्छता, उद्यानं ही असायलाच हवीत. आपण आपल्या देवस्थांनाना देखील तितकं मंगलमय ठेवले पाहिजे, म्हणजे भाविकांना मंगलमुर्तीचे दर्शन झाल्याचे समाधान खऱ्या अर्थाने प्राप्त होईल, असे सांगताना मुख्यमंत्र्यांनी अंबरनाथ येथील उदाहरणाचा दाखला आपल्या भाषणात दिला.