मुंबई – कोकणातील नाणार प्रकल्पाबाबत शिवसेनेची भूमिका बदललेली नाही असे स्पष्टीकरण राज्यातील शिवसेनेचे नेते व उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी काल धुळ्यात पत्रकारांशी बोलताना केले. या प्रकल्पाचा कोकणातील पर्यावरणावर विपरीत परिणाम होणार असल्याने शिवसेनेने त्या प्रकल्पाच्या विरोधात यापुर्वी मोठे आंदोलन केले होते. पण नाणार प्रकल्पाचीच एक मोठी जाहींरात शिवसेनेच्या मुखपत्रात प्रकाशित झाल्यामुळे शिवसेनेच्या भूमिकेविषयी प्रश्न चिन्ह निर्माण झाले होते. या जाहीरातामुळे शिवसेनेची नाणार प्रकल्पाविषयीची भूमिका बदलली आहे का असा सवाल उपस्थित केला जात होता.
सुभाष देसाई म्हणाले की आम्ही नाणार प्रकल्पाची अधिसूचनाच रद्द केली आहे. त्यामुळे हा प्रकल्प पुन्हा तेथे सुरू होण्याची शक्यता नाही. या प्रकल्पाविषयी इतकी ठाम भूमिका अन्य कोणत्याही राजकीय पक्षाने घेतलेली नाही आम्ही आमची भूमिकाही बदललेली नाही असे ते म्हणाले. या विषयावर कोणी अफवा किंवा गैरसमज पसरवण्याचे काम करू नये अशी सुचनाही त्यांनी केली. दरम्यान महाराष्ट्रातील गुंतवणूक वाढवण्यासाठी येत्या नोव्हेंबर महिन्यात मॅग्नेटिक महाराष्ट्र या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.