मुंबई : हा देश साफ करावाच लागेल, बीळे बुजवावीच लागतील. मी आज फक्त मोर्चाला मोर्चाने उत्तर दिले आहे. पण जास्त नाटके कराल, तर दगडाला दगडाने आणि तलवारीला तलवारीने उत्तर मिळेल हे याद राखा. त्यामुळे एकोप्याने रहा, असा सज्जड इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला.
भारतात घुसलेल्या पाकिस्तानी आणि बांग्लादेशी घुसखोरांना हाकलून देण्याच्या मागणीसाठी राज ठाकरे यांनी मनसेचा महामोर्चा आयोजित केला होता. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोर्चाला सुरूवात करण्याअगोदर प्रभादेवी येथील सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. तसेच मनसे पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिकांनी दादर येथील राममंदिरात सकाळी आरतीही केली.
गिरगाव हिंदू जिमखाना ते आझादमैदान असा हा मोर्चा काढण्यात आला. राज ठाकरे यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले. राज ठाकरे यांच्यासोबत अमित ठाकरे,शर्मिला ठाकरे यांच्यासह त्यांचे संपूर्ण कुटुंब या मोर्चात सहभागी झाले होते. आझादमैदान येथे मोर्चाचा समारोप झाला व तेथे राज ठाकरे यांनी मोर्चात आलेल्या महाराष्ट्र सैनिकांना संबोधित केले.
देशात अनेक बॉम्बस्फोट झाले. मुंबईत 1993 साली बॉम्बस्फोट झाले. त्या सगळयाचा कर्ताधर्ता दाउद इब्राहिम पाकिस्तानात आहे. अमेरिकेवर दहशतवादी हल्ला झाला त्याचा कर्ताकरविता लादेन पाकिस्तानात सापडला. पाकिस्तान आज दहशतवादाचा अड्डा बनला असल्याची टीका राज ठाकरे यांनी केली.
एका जागी फार मोठे षडयंत्र सुरू आहे. परदेशी मुल्ला-मौलवी त्या ठिकाणी येत आहेत. तिथे जे घडते आहे ते भयानक आहे. लवकरच आपण याची माहिती राज्याच्या आणि केंद्राच्या गृहमंत्र्यांना देणार आहोत. आपण फक्त बॉबस्फोटानंतर मेणबत्त्या काढतो आणि मार्च करतो. नंतर बसतो पुढच्या बॉंबस्फोटाची वाट बघत.
एनआरसीमुळे काही हिंदू आणि दलितांना अडचण होणार आहे म्हणतात. पण का अडचण होईल. ते तर इथलेच आहेत. आदिवासी देखील इथलेच आहेत. त्यांच्याकडे कोण कशाला पुरावे मागायला जाईल.
पण देशात कुठून तरी या साफसफाईची सुरूवात व्हायलाच हवी असेही राज ठाकरेंनी ठणकावले. आज दोन कोटी बांग्लादेशी भारतात घुसले आहेत. नेपाळमार्गे पाकिस्तानी किती घुसले असतील याची तर कल्पनाच नाही.पुण्यात एका बांग्लादेशी माणसाने मराठी नाव लावून एका मराठी मुलीशी लग्न केले.नंतर कळले की तो बांग्लादेशी आहे. हा देश काय धर्मशाळा बनलाय काय? पाकिस्तानी-बांग्लादेशी तर सोडाच आज मीरा-भाईंदरमध्ये नायजेरियन घुसले आहेत, असे राज ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्र 48 तासांसाठी पोलिसांच्या हातात द्या
मुंबई आणि महाराष्ट्र केवळ 48 तासांसाठी पोलिसांच्या ताब्यात द्या. फक्त त्यांचे हात बांधू नका मग बघा गुन्हेगारीचे प्रमाण शून्यावर येते की नाही असे सांगून राज ठाकरे म्हणाले, मुळात हा कायदा 1955 सालातला आहे. पाकिस्तानातील हिंदू हे अल्पसंख्यांक आहेत.
त्यांच्यावर अत्याचार होत आहेत. त्यांना या देशात घ्यावेच लागेल. त्यात गैर काय आहे? पण या विरोधात देशात मोर्चे निघाले. देशातील मुस्लिमांनी हे मोर्चे काढले. या देशातल्या लोकांचा या कायद्याशी संबंधच नाही. केंद्राने सीएए आणि एनआरसी या कायद्यांची कठोरतेने अंमलबजावणी करावी. या देशात तुम्हाला जितके स्वातंत्र्यत्र आहे तितके इतर कुठल्याही देशात नाही. त्यामुळे एकोप्याने रहा, असे आवाहनही राज ठाकरे यांनी केले.