कोल्हापूर : उद्योजकांच्या समस्यांबाबत ग्रामविकास, नगरविकास, उद्योग विभाग, उद्योग संस्थांचे प्रतिनिधी यांची एकत्रित 15 दिवसांत मंत्रालयात बैठक घेऊन निश्चितपणे त्यावर तोडगा काढला जाईल, असे आश्वासन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिले.
पार्वती इंडस्ट्रियल इस्टेट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर उपस्थित होते. देसाई म्हणाले, एकात्मिक औद्योगिक वसाहत धोरण जाहीर केले आहे. या धोरणाचा सहकार तत्वावर कसा वापर करता येईल, त्याबाबत उद्योजकांनी पुढे येऊन त्याचा लाभ घ्यावा. राज्य शासनाने औद्योगिक वसाहतीमधील पायाभूत सुविधांसाठी निधी निर्माण केला आहे.
सहकारी औद्योगिक संस्थासाठी निधी राखून ठेवण्याचे आश्वासन वित्तमंत्र्यांनी दिले आहे. एकात्मिक औद्योगिक वसाहत आणि सहकारी औद्योगिक वसाहत यांची सांगड घातली जाईल.
शेतीवर आधारित उद्योग उभारणीवर भर देण्याचे मुख्यमंत्र्यांचे धोरण आहे. त्याचबरोबर लघू उद्योगासाठीही राज्याने धोरण आणलेले आहे. सहकारी तत्वावर एकत्र येऊन लघू उद्योग उभारावेत त्यासाठी शासनाचा पाठिंबा आहे. हे शासन लोकाभिमुख असून उद्योजकांच्या समस्या निश्चितपणे सोडविल्या जातील, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.