नाशिक : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या मोर्चामागे कोणीही असले तरी काही फरक पडत नाही, असा टोला अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी लगावला आहे. याशिवाय बांगलादेश किंवा पाकिस्तानच्या घुसखोरांना हाकलण्याचा कार्यक्रम आजचा नाही तो 20 वर्षांपूर्वीचा आहे, असा दावा त्यांनी केला.
छगन भुजबळ म्हणाले, लोकशाहीमध्ये आपले मत मांडण्याचा आणि मोर्चा काढण्याचा सर्वांना हक्क आहे.
मुंबईतील आजच्या मोर्चामागे कुणीही असले तरी काही फरक पडत नाही. लोकशाहीमध्ये सगळ्यांना इकडून तिकडे, तिकडून इकडे जाण्याचा अधिकार आहे. पण आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत, असा चिमटा त्यांनी काढला. तसेच घुसखोरांच्या ट्रेन भरल्या जातात. लोकांना तिकडे उतरवतात. परत ते तिकडून बसतात आणि इकडे येतात. याच्यावर मार्ग काढण्यासाठी भारत सरकारने लक्ष दिले पाहिजे, असे छगन भुजबळ म्हणाले.