कोल्हापूर : खानापूर तालुक्यातील बोगुर गावाजवळ ट्रॅक्टर नाल्यात उलटून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात सात जण जागीच ठार झाले आहेत. तर पंधराहून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींना स्थानिक रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
तंगव्वा हुंचेन्नत्ती, अशोक केदारी, शांतवा अल्गोडी, गुलाबी हुंचीकट्टी, नागाव्वा मातोळे, शांतव्वा बिझोरे, नीलव्वा मुत्नाळ अशी मृतांची नावे आहेत.
बोगुर गावातील ऊस तोडणी कामगारांना घेऊन ट्रॅक्टर जात असताना हा अपघात झाला. ट्रॅक्टर वेगात असल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रॅक्टरने नाल्याच्या संरक्षक भिंतीला धडक दिली आणि ट्रॅक्टर खाली कोसळला. यात चार महिलांचा जागीच, तर तीन महिलांचा रुग्णालयात मृृत्यु झाला.
सर्व महिला बोगुर व आजुबाजुच्या गावातील असल्याची प्राथमिक माहिती मिळाली असुन घटनास्थळी खानापुरच्या आमदार तसेच बेळगांव जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी, अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख अमरनाथ रेड्डा घटनास्थळी दाखल झाले आहेत.
जखमींवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले आहे.
दरम्यान, चालकाच्या बेजबाबदारपणामुळे अपघात घडल्याचे बोलले जात आहे. अपघाताचे वृत्त समजताच स्थानिकांनी घटनास्थळी जाऊन बचावकार्याला सुरुवात केली. अपघातातील जखमींना स्थानिक रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नंदगड पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरू आहे.