नवी दिल्ली : महात्मा गांधी तुमच्यासाठी ट्रेलर असू शकतात. मात्र, आमच्यासाठी ते जीवन आहेत, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर पलटवार केला. राष्ट्रपतींच्या अभिभाषणाचे आभार मानताना ते लोकसभेत बोलत होते.
राष्ट्रपतींनी आपल्या अभिभाषणात नव्या भारताच्या दृष्टीकोनावर प्रकाशझोत टाकला आहे. शतकातील तिसऱ्या दशकात प्रवेश करत असताना त्यांचे हे अभिभाषण झाले आहे. त्यांच्या अभिभाषणाने आशा पल्लवीत झाल्या आहेत. भविष्यात देशाला पुढे घेऊन जाण्याचा मार्ग त्यांनी दाखवला आहे, असेही मोदी म्हणाले.
जनतेने केवळ सरकारच बदलले नाही तर “सारोकार’ही बदलले आहे. आम्ही जर जुन्या पध्दतीने काम करत असतो, तर कलम 370 हटवले गेले नसते. मुस्लीम महिलांची तिहेरी तलाकमुळे होणाऱ्या जाचातून सुटका झाली नसती. जर आम्ही जुन्या पध्दतीने काम करत असतो तर राम जन्मभूमीचा मुद्दा सोडवला गेला नसता. कर्तापूर साहेब कॅरिडोर झाले नसते. भारत बांगलादेश जमीन करार झाला नसता, असे ते म्हणाले.
पंतप्रधानांच्या भाषणात विरोधकांनी “महात्मा गांधी अमर रहे’ अशा घोषणा देत अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी कॉंग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी “ये तो अभी ट्रेलर है’, असे वक्तव्य केले. त्यावर पंतप्रधानांनी लगोलग महात्मा गांधी तुमच्यासाठी ट्रेलर असू शकतात मात्र, आमच्यासाठी ते जीवन आहेत, असा टोला लगावला.