पाणी पिण्याऐवजी विकासकामांसाठी वापरण्याचा पालिका प्रशासनाचा घाट
पुणे – “नदीसाठी पाण्याचे एक महत्त्वपूर्ण स्रोत असणाऱ्या झऱ्यांचे संवर्धन आवश्यक आहे. या झऱ्यांचे पाणी केवळ पिण्यासाठी वापरणे बंधनकारक असताना, महापालिका प्रशासनाला मात्र या नियमाचा विसर पडल्याचे दिसून येते. त्यामुळेच की काय शहरातील पुनरूज्जीवित केलेल्या निवडक झऱ्यांचे पाणी पिण्याऐवजी विकासकामांसाठी वापरण्याचा घाट प्रशासनाकडून घातला जात आहे.
महापालिका प्रशासनाने नुकत्याच प्रकाशित केलेल्या अंदाजपत्रकात शहरातील बावधन येथील झरा, सिद्धेश्वर-वृद्धेश्वर घाटाजवळील झरा, मृत्युंजय मंदिर परिसरातील झरा अशा विविध झऱ्यांचे पुनरूज्जीवन करून, या झऱ्यांचे पाणी विकासकामासाठी विशेषत: बांधकामासाठी वापरणार असल्याची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, हे झरे म्हणजे नदीच्या पाण्याचे स्रोत असून, नदी प्रवाही राहण्यासाठी तिची परिसंस्था संरक्षित राहण्यासाठी महत्त्वपूर्ण असून, या झऱ्यांचे पाणी विकासकामांसाठी न वापरता पिण्यासाठी वापरावे अथवा ते प्रवाही राहू द्यावेत, असे मत पर्यावरणतज्ज्ञांकडून उपस्थित केले जात आहे.
याबाबत बावधन झरा संवर्धनासाठी कार्य करणारे शैलेंद्र पटेल म्हणाले, “नदीच्या सुदृढ आरोग्यासाठी झरा जिवंत राहणे गरजेचे आहे. यासाठी भूजल सर्वेक्षण आणि विकास संस्थेतर्फे (जीएसडीए) आणि महाराष्ट्र वॉटर अथॉरिटी’ने बावधन येथील झऱ्याच्या पाण्याची तपासणी करून, संवर्धनाबाबत मार्गदर्शक सूचनाही दिल्या आहेत.
या झऱ्याचे पाणी फक्त पिण्यासाठी वापरावे, असा आदेशही दिला आहे. परंतु एक वर्षानंतरही त्यासंदर्भात अजून काहीच झाले नाही. रामनदीला पूरक असलेल्या 50 झऱ्यांपैकी आतापर्यंत केवळ 18 झरे सापडले आहेत. त्यातही अस्तित्वात असलेल्या झऱ्यांचे योग्य संवर्धन झाले नाही, तर नदीदेखील प्रवाही राहणार नाही. यावर विचार करण्याची गरज आहे.’
नैसर्गिक गोड्या पाण्याचे स्रोत किंवा झरे आपण अनैसर्गिक कामासाठी वापरू लागलो, निसर्गात असा अशास्त्रीय हस्तक्षेप (खरंतर ढवळाढवळ) करू लागलो, तर आपणच आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेतल्यासारखे होईल. एकीकडे आपण म्हणतो, की नदी ही शुद्ध पाणी असलेली, अविरत वाहती, प्रवाही असली पाहिजे आणि दुसरीकडे आपणच हे गोड्या पाण्याचे झरे त्या नदीला मिळण्यापासून बंद करत आहोत. गोडं पाणी नदीला मिळालेच नाही, तर नदीला मिळणारा शाश्वत प्राणवायूदेखील कायमचा बंद होऊ शकेल. झऱ्यांचे पाणी आपण इतर अनैसर्गिक कामासाठी वापरण्यास सुरुवात केली, तर तो फार मोठा पर्यावरणीय किंवा निसर्ग गुन्हा ठरू शकेल.
– डॉ. सचिन पुणेकर, पर्यावरण अभासक.