पुणे – जगात शिक्षणाला डिग्री लागते. कलेला कोणतीही डिग्री लागत नाही. त्यामुळे उत्तम कलेला मरण नाही, असे मत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले. यामुळेच मला कोणी डिग्री विचारत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
झील इन्स्टिटयूटस व कार्टूनिस्ट कंबाईन यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील विद्यार्थ्यांसाठी व्यंगचित्र रेखाटण्याच्या “इंक अलाइव्ह’ या कार्यशाळेचे बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि.द.फडणीस यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी कार्टूनिस्ट चारुहास पंडीत, संजय मिस्त्री, घनश्याम देशमुख, प्रशांत कुलकर्णी, झील इन्स्टिट्यूटचे संस्थापक संभाजी काटकर, सचिव जयेश काटकर, कार्यकारी संचालक प्रदीप खांदवे आदी उपस्थित होते.
प्रत्येकामध्ये कोणती तरी कला ही आढळतेच. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच उत्तम कला जोपासलीच पाहिजे. शिक्षकांनीही विद्यार्थ्यांमधील दडलेली कला ओळखून त्यांना आवश्यक ते मार्गदर्शन केले पाहिजे. याबरोबरच पालकांनी मुलांना मार्गदर्शन करावे, असा सल्लाही ठाकरे यांनी दिला. शि.द.फडणीस यांनी व्यंगचित्राचे प्रात्यक्षिक दाखविले. ते पहायला मिळालेले विद्यार्थी भाग्यवान आहेत, असेही त्यांनी सांगितले.
राज्य शासन चित्रकला हा विषय ऑपशनला टाकत असताना “झील’ सारख्या संस्था चित्रकलेच्या प्रोत्साहनासाठी पुढे येतात हे विशेष म्हणावे लागणार आहे, असा टोलाही ठाकरे यांनी शासनाला लगावला आहे.
शि.द.फडणीस यांनी शहनाईवाला, राजकन्येचे व्यंगचित्र रेखाटून कार्यशाळेचे उद्घाटन केले. विद्यार्थ्यांनीही त्याला उत्स्फूर्तपणे दाद दिली. यावेळी फडणीस यांनी शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पुस्तकाबाहेरच्या जगाचा परिचय विद्यार्थ्यांना व्हायला पाहिजे. प्रत्येकाला दैवी देणगी मिळालेली आहे. ती वापरायला मोकळीकही मिळायला हवी, असे फडणीस यांनी सांगितले आहे.
विद्यार्थ्यांना चित्रकलेचा अधिकाधिक परिचयही करुन देणे आवश्यक आहे. चित्रकला स्पर्धा कोऱ्या कागदासमोर उभे राहून पूर्ण करावी लागते. यासाठी पुस्तकातील धड्याचा उपयोग होत नाही. चित्रकला ही विचार समजून घेण्याची एक भाषाच आहे. त्यात खूप ताकदही आहे. विद्यार्थ्यांनी साचेबध्द विचारशक्तीपासून मुक्त होऊन सजृनशीलता अंगी बाळगली पाहिजे, असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.
प्रत्येक भाषा बोलकी असते. चित्र ही पहिली भाषा असून जगातील सर्व भाषा या चित्ररुपी आहेत. कलेला महत्व असल्याने ती प्रत्येकाने शिकणे आवश्यक आहे. काळजाला हात घालण्याचे काम व्यंगचित्रकार करत असतात, असे संजय मिस्त्री यांनी सांगितले आहे.
पुणे शहरातील 53 शाळांमधील 600 विद्यार्थ्यांनी कार्यशाळेत सहभाग घेतला. कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी काढलेल्या व्यंगचित्रांचे 5 व 6 फेब्रुवारी रोजी बालगंधर्व रंगमंदिरच्या कलादालनात प्रदर्शनही भरविण्यात येणार असून उत्कृष्ट व्यंगचित्रांना पारितोषिकही देण्यात येणार आहे.