जोहान्सबर्ग : मुंबईकर यशस्वी जयस्वाल व अथर्व अंकोलेकर यांची फलंदाजी व कार्तिक त्यागी आणि आकाश सिंग यांच्या गोलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाने बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा 74 धावांनी पराभव करत 19 वर्षांखालील विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. चार गडी बाद करणारा कार्तिक त्यागी सामनावीर ठरला.
प्रथम फलंदाजी करताना भारताने जयस्वाल व अंकोलेकर यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर 233 धावा केल्या. जयस्वालने 82 चेंडूत 6 षटकार व 2 चौकार फटकावताना 62 धावांची खेळी केली. अंकोलेकरने 54 चेंडूत 5 षटकार व 1 चौकार फटकावून नाबाद 55 धावा केल्या. रवी बिष्णोईने आक्रमक 30 धावांची खेळी कतरत संघाला समाधानकारक धावसंख्या उभारून दिली. ऑस्ट्रेलियाकडून कौरे केली व टॉड मर्फी यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. ऑस्ट्रेलियाने 20 अवांतर धावांची दिलेली भेट देखील भारताच्या पथ्यावर पडली.
विजयासाठी 234 धावांचा पाठलाग करताना सलामीवीर सॅम फेनिंगच्या दमदार फलंदाजीनंतरही ऑस्ट्रेलियाला हा सामना गमवावा लागला. 5 बाद 68 अशा बिकट स्थितीतून फेनिंगने लियाम स्कॉटच्या साथीत संघाचा डाव सावरला. एकवेळ ही जोडी भारतासाठी डोकेदुखी ठरणार असे वाटत असतानाच आकाश सिंगने फेनिंगला बाद करत मोठा अडसर दूर केला. त्यापूर्वी कार्तिक त्यागीने 4 फलंदाजांना बाद करत ऑस्ट्रेलियावर सुरुवातीापासूनच दडपण ठेवले. आकाशसिंगने 3 गडी बाद करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. 44 व्या षटकांत ऑस्ट्रेलियाला रोखत भारताने 74 धावांनी विजय मिळवित स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली.
संक्षिप्त धावफलक – भारत – 50 षटकांत 9 बाद 233. (यशस्वी जयस्वाल 62, रवी बिष्णोई 30, अथर्व अंकोलेकर नाबाद 55, टॉड मर्फी 2-40, कौरे केली 2-45). ऑस्ट्रेलिया – 43.3 षटकांत सर्वबाद 159. (सॅम फेनिंग 75, लियाम स्कॉट 35, कार्तिक त्यागी 4-24, आकाश सिंग 3-30).