हिमांशू
ज्या देशात शून्याचा शोध लागला, त्या आपल्या भारतात गणिताची सध्याची परिस्थिती काय आहे, याबद्दलचा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला. जगभरात गणितज्ज्ञांना असलेली मागणी वाढत असताना, गणित हा आनंदाचा विषय आहे, हे आपल्याकडे कुणी मान्यच करायला तयार नाही, ही शिक्षकांची व्यथा आहे. काही वर्षांपूर्वी जागतिक गणित स्पर्धा परीक्षेत भारतीय विद्यार्थ्यांचा शेवटून तिसरा क्रमांक लागला. मूळ भारतीय वंशाचे गणितज्ज्ञ मंजुल भारद्वाज यांनी गणितातलं फिल्ड्स मेडल नुकतंच पटकावलं, तेव्हा ही घटना भारतीय विद्यार्थ्यांमध्ये या विषयाची आवड निर्माण करणारी ठरेल, असं वाटलं होतं. पण शून्यापासून सुरू झालेला प्रवास आज शून्यावर येऊन थांबलाय, असंच म्हणावं लागतं. आठव्या इयत्तेत शिकणाऱ्या 56 टक्के विद्यार्थ्यांना तीन अंकी संख्येला एक अंकी संख्येनं भागता येत नाही. पाचवीतल्या 76 टक्के विद्यार्थ्यांना भागाकारच येत नाही. तिसरीतल्या मुलांना वजाबाकी करता येत नाही, असे भयावह निष्कर्ष “प्रथम’ या स्वयंसेवी संस्थेनं आपल्यासमोर मांडलेत. या स्वयंसेवी संस्थांना नेहमी वाईटच गोष्टी कशा दिसतात, कळत नाही. आजमितीस या देशातले निरक्षर लोकही राजकारण, अर्थकारण, समाजकारण या सगळ्या विषयांमध्ये पारंगत झालेत, सोशल मीडियामुळे अनेक लेखक, कवी निर्माण झालेत, हे या संस्थांना कसं दिसत नाही? गणितं करायला कॅलक्युलेटर आणि कॉम्प्युटर आहेच की! निरूपयोगी गोष्टींचा लय होणारच!
पूर्वी पाढ्यांबरोबर शाळेत मिळवण्याही पाठ करून घेतल्या जात असत. त्याहीपूर्वी पावक्या, निमक्या, दीडक्या, अडीचक्या होत्या. कालांतराने त्यांचा उपयोग राहिला नाही म्हणून आपण ते सगळे बंद केले. रुक्ष गणिताचा वेळ वाचवणारी यंत्रं आता आमच्याकडे आहेत. त्या यंत्रांनाही सोडवता येणार नाही, असे एखादं गणित असेल, तरच आमचं घोडं अडतं. परवा असेच एक अवघड गणित आमच्यासमोर आलं. तेलंगणमध्ये नगरपालिका निवडणुकीत एका उमेदवाराला शून्य मतं मिळाली, ही गोष्ट आम्हाला शून्याच्या शोधापेक्षा अधिक आचंबित करणारी ठरली. या घटनेत धक्क्यामागून धक्के देणाऱ्या अनेक गोष्टी आहेत. पहिली गोष्ट म्हणजे, ज्यांना शून्य मतं मिळाली, ते नागरानी इसरावेल्ली हे काही अपक्ष उमेदवार नव्हेत. कॉंग्रेससारख्या देशातल्या सर्वांत जुन्या पक्षाचे ते उमेदवार. काही हौशी अपक्ष उमेदवार प्रत्येक निवडणुकीत असतात. त्यांना कुणीच ओळखत नसतं; मात्र तरी ते दोन अंकी मतं सहज घेतात. कारण एक मत तर उमेदवाराचे स्वतःचं असते. दुसरं त्याच्या बायकोचं आणि दहा-बारा मतं कुटुंबीय आणि मित्रांची मिळतात. परंतु आपलं स्वतःचंही मत मिळू न शकलेल्या या उमेदवाराच्या बाबतीत नेमकी काय जादू झाली, याचं सगळ्यांनाच कोडं पडले.
या उमेदवाराच्या वॉर्डात अपक्ष उमेदवार निवडून आला. त्याला 671 मते पडली. दुसऱ्या क्रमांकाच्या उमेदवाराला 443 मतं पडली. 14 मतं बाद झाली आणि 5 मतदारांनी “नोटा’चा पर्याय निवडला. पण इरसावेल्ली यांचं
स्वतःचं मत कुठे गेले? त्यांच्या कुटुंबीयांची मते कुठे गेली? या प्रश्नांची उत्तरं नंतर मिळाली. नागरानी यांचं घर आणि घरातल्यांचं मतदान एका वॉर्डात आहे आणि ते उभे राहिले होते दुसऱ्याच वॉर्डातून. हेच शून्याचं गुपित!