दरवर्षी प्रजासत्ताक दिनी राष्ट्रीय शौर्य पुरस्कार दिला जातो. यावर्षी महाराष्ट्रातील दोन बालवीरांना हा पुरस्कार दिला गेला. त्यातील एक आहे दहा वर्षाची झेन सदावर्ते. जेव्हा या पुरस्काराच्या यादीत झेन सदावर्ते हिचे नाव आले तेंव्हा दोन वर्षापूर्वी याच झेन मुळे 17 जणांचे प्राण वाचले ही बातमी आठवली. टीव्हीवर तिचे होणारे कौतुकही आठवले. 22 ऑगस्ट 2018 ला मुंबईतील परळ येथील क्रिस्टल टॉवर या 17 मजली इमारतीला आग लागली. या घटनेत 4 जणांचा मृत्यू झाला होता तर 16 जण जखमी झाले होते. 16 व्या मजल्यावर राहणाऱ्या झेनच्या घरातही आग लागली.
शेजारीपाजारी किंचाळत बाहेर निघाले. पण काही जण धुरामुळे घुसमटले. झेनच्या घरातही धुराचे लोळ आले. घर पूर्ण कार्बन डायऑक्साईडने भरून गेले. अशा वेळी कोणीही घाबरून गेले असते पण झेन घाबरली नाही. उलट झेनने आई-वडिलांना व शेजारी राहणाऱ्या लोकांना घाबरून जाऊ नका, असा सल्ला देऊन जिथे धूर कमी आहे तिथे अशा ठिकाणी त्यांना घेऊन गेली. तिने मेन स्विच बंद केला आणि अग्निशमन दलाला फोन केला. तिने सुती कपडे ओले करून तोंडाभोवती गुंडाळले. तिच्या आई-वडिलांना आणि शेजाऱ्यांनाही असे करण्यास सांगितले. त्यामुळे दूषित हवा व धूर कोणाच्याही नाका-तोंडात गेला नाही त्यामुळे कोणीही गुदमरले नाहीत.
त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी या सर्वांना सुखरूप वाचवले. झेनने दाखवलेल्या प्रसंगावधनामुळे 17 जणांचा प्राण वाचला. आगीच्या वेळी कार्बनयुक्त धूर नाकात जातो त्यामुळे हवा गाळून घ्यावी हे तीन वर्षापूर्वी तिच्या शिक्षिकेने शिकवलेले तिच्या लक्षात होते. त्यामुळेच तिने ओले सुती कपडे सर्वांना तोंडाभोवती गुंडाळण्यास सांगितले. शाळेत शिकवलेल्या शिक्षणाचा, ज्ञानाचा उपयोग व्यवहारात करणारे विद्यार्थी आपल्या देशात अभावानेच आढळतात. म्हणूनच झेनचे विशेष कौतुक वाटते.
आता ती सहावीत आहे. तिसरीत असताना तिच्या शिक्षिकेने संकटाच्या वेळी काय करायचे हे सांगितले ते ती विसरली नाही उलट संकटावर मात कशी करायची, नैसर्गिक, मानवनिर्मित आपत्ती आल्यास त्यावर कशी मात करायची याचा अभ्यास तिने केला. तिचे वाचनही अफाट आहे वेगवेगळ्या विषयांवरील पुस्तके ती वाचते. तिचे कपाट पुस्तकांनी भरले आहे. महात्मा गांधी, डॉ बाबासाहेब आंबेडकर, मदर टेरेसा यांची चरित्रे तिने वाचून काढली आहेत.
भारत, कॅनडा, दक्षिण आफ्रिका, अमेरिका व ब्राझील या पाच देशांच्या घटना तिने वाचल्या आहेत. एखादा घटनातज्ज्ञ ज्या प्रमाणे घटनेवर बोलू शकतो त्याप्रमाणे तीही भारतीय राज्यघटनेवर बोलू शकते, लिहू शकते. तिचे वडील ऍड गुणरत्न सदावर्ते व आई ऍड जयश्री पाटील हे दोघेही कायदेतज्ज्ञ आहेत. तिलाही भविष्यात त्यांच्याप्रमाणेच कायदेतज्ज्ञ बनायचे आहे.
-श्याम बसप्पा ठाणेदार