जयपूर- केंद्रातील नरेंद्र मोदी यांचे राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार काही चांगली कामे करत असले तरीही त्यांचे धोरण हे विभाजन वादी असल्याचे दिसून येत आहे असे प्रतिपादन माजी केंद्रीय पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी केले. तेराव्या जयपूर लिटरेचर फेस्टिवलमध्ये ते बोलत होते. रमेश पुढे म्हणाले की मोदी सरकारने काही चांगल्या गोष्टी केल्या आहेत हे खरे आहे. त्यामध्ये जीएसटी आणि निर्मल भारत अभियान याचा समावेश होतो. मात्र या दोन्ही गोष्टी कॉंग्रेस प्रणित संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने सुरू केल्या होत्या त्याचे श्रेय मोदी सरकार घेत आहे.
आज मोदी सरकार भारतीय नागरिकांमध्ये विभाजनाची बीजे पेरत असल्याचा आरोप करून रमेश पुढे म्हणाले की या सरकारचे धोरण हे धार्मिक जातीय भाषिक प्रांतीय आणि अगदी खाण्याच्या पद्धती मधील फरक या वरूनही ही विभाजनाची बीजे पेरली जात आहेत. अशा पद्धतीने जर या सरकारची धोरणे सुरू राहिली तर देशामध्ये अस्थैर्य माजेल अशी भीती रमेश यांनी व्यक्त केली.
पर्यावरण रक्षण आणि जागतिक तापमान वाढ याविषयी बोलताना जयराम रमेश म्हणाले की आज केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांचे अस्तित्व दिसून येत नाही केवळ प्लॅस्टिक हटाव असा नारा देऊन पर्यावरण सुधारणार नाही. त्यासाठी दूरदृष्टीने पावले उचलणे गरजेचे आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती जास्त असल्यामुळे त्या आज जास्त वापरल्या जात नाही मात्र सरकारने यामध्ये लक्ष घालून सर्वसामान्य नागरिकांना परवडतील अशा दरात इलेक्ट्रिक वाहने उपलब्ध करून दिली तर भूगर्भातील इंधनावर आपल्याला आवलंबून राहावे लागणार नाही हे वास्तव आहे.