नवी दिल्ली – भाजपचे नेते कपिल मिश्रा यांनी दिल्ली निवडणुकीविषयी ट्विटरवरून केलेले भाष्य धार्मिक विद्वेष पसरणारे असल्याने ते काढून टाकण्याचा आदेश निवडणूक आयोगाने ट्विटरला दिला आहे. दिल्लीची निवडणूक म्हणजे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यासारखी आहे असे नमूद करीत मिश्रा यांनी ही आक्षेपार्ह टिपण्णी केली होती.
त्यावर दिल्लीच्या निवडणूक अधिकाऱ्याने निवडणूक आयोगाकडे या टिपण्णी विषयी कारवाई करण्याची शिफारस केली होती. या प्रकरणी मिश्रा यांनाहीं नोटीस बजावण्यात आली आहे. मिश्रा हे पुर्वीचे आम आदमी पक्षाचे आमदार होते पण आता ते भाजपच्यावतीने मॉडेल टाऊन मतदार संघातून निवडणूक लढवत आहेत.
सध्या विरोधकांवर ते पाकिस्तानची भाषा बोलत आहेत असा सर्रास आरोप भाजपकडून केला जात आहे. त्यांनी अशा प्रकारच्या टिपण्णीकरून दिल्लीच्या निवडणुकीलाही भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याचे स्वरूप आले असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला आहे.