राज्यमंत्री दत्तात्रय भरणे : रब्बीसाठी एक, उन्हाळी हंगामासाठी 3 आवर्तने
रेडा- शेटफळ तलावातून यावर्षी शेती सिंचनासाठी चार आवर्तने देण्यात येणार आहेत. एक रब्बीसाठी तर तीन उन्हाळी आवर्तने मिळणार आहेत. पहिले आवर्तन दि. 1 फेब्रुवारीपासून सुरू होणार असल्याची माहिती राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. पुणे येथील सिंचन भवनमध्ये शुक्रवारी (दि. 24) कालवा सल्लागार समितीची बैठक पार पडली. त्यावेळी भरणे यांनी ही माहिती दिली.
शेटफळ तलावाची एकूण पाणी क्षमता 620 दशलक्ष घनफुट असून सध्या तलावामध्ये 612 दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे. तलावातून दि. 1 फेब्रुवारीपासून रब्बीच्या आवर्तनास सुरवात होणार आहे. रब्बीचे आवर्तन दि. 3 मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. तर उन्हाळ्यामध्ये तलावातून तीन आवर्तने देण्यात येणार आहेत. पहिले आवर्तन 18 मार्च ते 19 एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे. दुसरे आवर्तन दि. 29 एप्रिल ते दि. 30 मेपर्यंत सुरू राहणार आहे. तिसरे आवर्तन दि. 6 जून ते दि. 31 जूनपर्यंत सुरू राहणार आहे. यावर्षी उन्हाळी हंगामातील पाण्याचे काटेकोरपणे नियोजन करण्याच्या सूचना पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या आहेत. कालवा, उपकालवे व चाऱ्यांची दुरुस्ती करण्यात येणार असल्याचे भरणे यांनी सांगितले. यावेळी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र धोडपकर, उपविभागीय अभियंता विजय यादव, शाखाधिकारी रतन झगडे आदी उपस्थित होते.