मुंबई : चीन मधून आलेल्या पाच जणांना वैद्यकीय निगराणीखाली ठेवण्यात आले असून त्यापैकी दोघांना स्वतंत्र कक्षात ठेवण्यात आले आहे. त्यांना वुहान विषाणुंची बाधा झाल्याचा संशय आहे. हे पाचही जण चीन मधून आले होते..
किरकोळ ताप आलेल्या दोघांना मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले. हे राज्यातील मुख्य स्वतंत्र कक्ष आहे. हे रुग्णालय मुंबई महापालिकेतर्फे चालवण्यात येते. पुण्यातील नायडू विषाणूजन्य आजार रुग्णालय येथे दुसरा स्वतंत्र कक्ष उभारण्यात आला आहे. वुहान विषाणूंची जगभरात 830 जणांना बाधा झाली असून आतापर्यंत 25 बळी घेतले आहेत.
दरम्यान चीनमध्ये राहणाऱ्या भारतीयांसाठी भारतीय दुतावासाने दोन हॉटलाईन सुरू केल्या आहेत. सौदी अरेबियात केरळमधील एका परिचारिकेस वुहान विषाणूची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. इंग्लंडमध्ये वुहान विषाणू सदृश विषाणुंची बाधा झालेल्या 14 जणांवर उपचार सुरू आहेत. 830 बाधीतांपैकी 177 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.