तेराशे किमीचा प्रवास; इंधन बचत, तंदुरुस्त राहण्याचा संदेश
मायणी – सह्याद्री ट्रेकर्स ग्रुपच्या मायणी (ता. खटाव) व विटा (जि. सांगली) येथील तीन सदस्यांनी मायणी ते द्वारका (गुजरात) ही सुमारे 1300 किमीची मोहीम सायकलवरून फत्ते केली. 2 जानेवारीपासून सुरू झालेल्या मोहिमेत “सायकल चालवा, इंधन वाचवा, पर्यावरण जपा, तंदुरुस्त रहा, असा संदेश दिला.
मायणी येथून मोहिमेस प्रारंभ करण्यात आला. नाशिक-सापुतारा-वासंडा-स्टॅच्यू ऑफ युनिटी-जुनागड-गिरनार-सोमनाथ या मार्गे द्वारकेपर्यंतचा 1300 किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला. या प्रवासात विजय वरुडे, शिवाजी कणसे (मायणी), राहुल बाबर (विटा) या सायकलस्वारांचे ठिकठिकाणी स्वागत करून त्यांची मुक्कामाची सोय स्थानिकांनी केली.
त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले. या सदस्यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगातील सर्वाधिक उंच पुतळा, दहा हजार पायऱ्या असलेले गुरूदेव दत्त यांचे देवस्थान, भगवान श्रीकृष्णाने जेथे मानवी देहाचा त्याग केला, ते वेरावळचे भालका तीर्थमंदिर, दिव किल्ला, ज्योतिर्लिंग सोमनाथ मंदिर, या धार्मिक व प्रेक्षणीय स्थळांना भेटी दिल्या.
यापूर्वी या तिघांनी पंढरपूर, तिरुपती बालाजी, गणपती पुळे, नळदुर्ग, कन्याकुमारी, जगन्नाथपुरी असा प्रवास सायकलवरून केला होता. त्यानंतर 1300 किमीची द्वारका मोहीम फत्ते केली. ते परतीचा प्रवास रेल्वेने करणार आहेत.
आजच्या धावपळीच्या युगात सर्व जण व्यावसायिक गाडा ओढत खरी जीवनशैली विसरत चालले आहेत; परंतु व्यावसायिक जबाबदाऱ्या पेलत निसर्गाच्या सान्निध्यात जाण्याची आणि गडकिल्ले सर करण्याची आवड आम्हाला आहे. त्यामुळे सह्याद्री ट्रेकर्स ग्रुपच्यावतीने आम्ही द्वारका मोहीम पूर्ण केल्याने आमचा आनंद द्विगुणित झाला आहे.
विजय वरुडे