सर्व कार्यालयांमधील दांडीबहाद्दरांची मागवली माहिती
पुणे – कोणतीही पूर्वकल्पना न देता गैरहजर राहणाऱ्या कृषी विभागातील कर्मचाऱ्यांवर प्रशासनाकडून करडी नजर ठेवली जात आहे. त्याकरिता सर्व कार्यालयांमधील असल्या दांडीबहाद्दरांची माहिती कळविण्याचे आदेश दिले आहेत. याकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिला आहे.
राज्य शासनाच्या कृषी विभागातील मनुष्यबळाची कायम चर्चा होत असते. मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ उपलब्ध असतानादेखील कामांचा निपटारा त्यावेगाने होत नसल्याची परिस्थिती आहे. विभागातील अनेक कर्मचारी कोणतीही पूर्वकल्पना न देता अनेक दिवस गैरहजर राहत असल्याची बाब प्रशासनाच्या निदर्शनास आली आहे. तर, कामावर हजर होताना वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करत असल्याने अन्य शासकीय सोपस्कर पार पाडण्यासाठी अनेक समस्या उद्भवतात. गैरहजेरीची प्रकरणे वरिष्ठ पातळीवर विलंबाने उपलब्ध होत असल्याने अनेक वैद्यकीय तपासणीला पाठवून खात्री करण्यासारख्या तांत्रिक समस्या उद्भवतात.
दांडीबहाद्दरांना चाप लावण्यासाठी अनुपस्थित राहणाऱ्या कर्मचाऱ्याची माहिती घेण्यासाठी दोन महिने वाट पाहण्याची आवश्यकता नसल्याचे कृषी आयुक्त सुहास दिवसे यांनी काढलेल्या परिपत्रकात स्पष्ट केले आहे. रजेचा अर्ज न देता तसेच महिनाभर गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा प्रस्ताव तत्काळ सादर करण्याचे या परिपत्रखात नमुद केले आहे. दांडीबहाद्दरांना आवर घालण्यासाठी कृषी आयुक्तालयाच्या वतीने एक चार्ट तयार केला आहे.
दर महिन्याला दांडीबहाद्दरांची जिल्हानिहाय माहिती या चार्टमध्ये भरून ती कृषी सहसंचालक कार्यालयाला सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या पुढील काळात पूर्वपरवानगीशिवाय रजा अथवा गैरहजेरीची प्रकरणे विलंबाने वरिष्ठ पातळीवर न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा या परिपत्रकात दिला आहे.