जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी स्वीकारला पदभार
सातारा (प्रतिनिधी) –गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात काम करताना अनेक आव्हाने होती. मात्र, त्या तुलनेने भौगोलिक विषमता असणारा सातारा जिल्हा पर्यावरणदृष्टया समृध्द आहे. जिल्ह्याची माहिती सातत्याने मिळवत आहे. जिल्हयाचे प्रश्न समजून घेतल्यावरच माझ्या कामाला सुरवात होणार आहे, अशी ग्वाही साताऱ्याचे नूतन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली.
नूतन जिल्हाधिकाऱ्यांनी शनिवारी दुपारी तीन वाजता पदभार स्वीकारला. गडचिरोली येथून श्री. सिंह याची बदली सातारा येथे झाल्यानंतर त्यांनी सातारच्या मावळत्या जिल्हाधिकारी आणि विद्यमान अतिरिक्त आयुक्त श्वेता सिंघल यांच्याकडून जिल्हाधिकारीपदाचा कार्यभार हाती घेतला. प्रारंभी श्वेता सिंघल यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, कीर्ती नलावडे, संगीता चौगुले, अश्विनी जिरंगे, जिल्हा नियोजन अधिकारी बी. जे. जगदाळे, जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा देवकाते, सातारच्या तहसीलदार आशा होळकर यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी शेखर सिंह मूळचे दिल्ली येथील असून त्यांचे शिक्षणही दिल्लीत झाले. श्री. सिंह 2012 च्या बॅचचे आयएएस आहेत. त्यांनी यापूर्वी नागपूर येथे प्रशिक्षणार्थी अधिकारी म्हणून काम केले आहे. रामटेक (जि. नागपूर) येथे प्रांताधिकारी, सिंधुदूर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी त्यानंतर त्यांनी गडचिरोली येथे जिल्हाधिकारी म्हणून काम केले आहे.
प्रशासनाच्या वतीने अतिरिक्त जिल्हाधिकारी आर. एस. शिंदे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. सिंह यांनी पहिल्याच भेटीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. कामाची सुरवात कशी करणार, या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले, “”आधी जिल्हा समजावून घ्यायचा आहे. साताऱ्याविषयी मी सातत्याने माझे काही वरिष्ठ व बॅचमेटसकडून मी माहिती घेत आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने सातारा समृध्द आहे.
पूर्वेचा दुष्काळ व पश्चिमेची अतिवृष्टी ही जिल्ह्याची वैशिष्टये आहेत. प्रश्न सजावून घेतल्यावर कामाला गती मिळेल.” गडचिरोलीसारख्या दुर्गम व आदिवासीबहुल जिल्हयात विकासाचे प्रश्न गंभीर आहेत. 2010 व 2019 चा अपवाद वगळता तेथे नक्षलवादाचे प्रमाण प्रचंड कमी झाले आहे. विकासाचे अनेक प्रश्न तेथे यशस्वीपणे मार्गी लावले. गडचिरोली जिल्ह्यात राईस मिल मोठया प्रमाणावर आहेत. तेथे रक्त कमी असणाऱ्या आदिवासी स्त्रियासाठी तांदळाच्या पौष्टिक पदार्थाची आहार योजना सुरू केली. हा प्रकल्प भारतातील पहिला पथदर्शी प्रकल्प ठरल्याचे सिंग यांनी सांगितले.
साताऱ्याचे प्रश्न खूप आहेत. साताऱ्याचे प्रश्न मी येत्या तीन महिन्यांत समजावून घेणार आहे. प्रशासनातील सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन प्रलंबित कामाचा निपटारा टप्पाटप्प्याने सुरू करणार आहे.
शेखर सिंह ,जिल्हाधिकारी, सातारा.