काल प्रयोग संपल्यानंतर आमच्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी होतं. आता महिनाभर कुणाच्या गाठीभेटी होणार नाही म्हणून सगळेच भावुक झाले होते.’ “तुम्ही महिनाभर घरी असणार यावर माझा तर विश्वासच बसत नाही.’ “अगं खरंच. चिमटा काढू का?’ “नाही नको. किती आनंद झालाय म्हणून सांगू! थांबा. तुम्हाला कोथिंबिरीच्या वड्या करून खायला आणते.’ “एकवेळ नाटकाच्या प्रयोगाला सुट्टी मिळेल; पण माझ्यावर तुझे पाककलेचे प्रयोग मात्र आजन्म चालूच राहणार यात तिळमात्र शंका नाही.’ “अहो, मघाशी चिमटा काढला असता तर तोच परवडला असता.’ कोपरखळ्या मारायला तशी सुधा देखील काही कमी नव्हती. किती झालं तरी एका कलाकाराचीच बायको ती! “अहो, आपण फिरायला जायचं का?’ “मी पण तोच विचार करत होतो. जुईला विचारून बघ.’ तेवढ्यात पाठीमागून आवाज आला. “गुड मॉर्निंग बाबा. ममा, कोथिंबिरीच्या वड्या. काय बुवा, तुमचे “हे’ आज घरी आहेत तर एवढे लाड.’ “आता महिनाभर मला हे लाड पचवावेच लागणार.’ “म्हणजे?’ “महिनाभरासाठी आमचे नाटकाचे प्रयोग बंद आहेत.’ “काय सांगताय? बाबा, मस्तपैकी कुठेतरी आउटिंगला जाऊ या का?’ “आम्हीच तुला विचारणार होतो. तुला वेळ मिळेल का म्हणून?’ “आजच माझी साईट पूर्ण होईल. नंतर आठवडाभर तरी मी निवांतच आहे.’ “पण जायचं कुठं?’ “बाबा, मी सुचवू.’ “हं… पारगावला. गोपाळ काकाकडं.’
पारगाव, मकरंदचं गाव. आणि गोपाळ, त्याचा बालमित्र. मकरंदला गाव सोडून बरीच वर्षे लोटली होती. जेमतेम बारावी पास मकरंदला अभिनयाचं वेड होतं. तिकडे आण्णा-माईला वाटायचं, मकरंदने कुठंतरी नोकरी करावी आणि याचे दोनाचे चार हात व्हावे. मकरंद न सांगता घरातून मुंबईला निघून गेला. उशिरा का होईना; पण नशिब त्याला साथ देत गेलं. नाव कमवूनच गावाकडे परतेल अशी खूणगाठ त्याने मनाशी बांधली होती. बघता बघता आठ-दहा वर्षे सरली. दरम्यानच्या काळात आपला मुलगा कुठं गेलाय, तो कसा असेल या काळजीने आण्णा पार खचून गेले होते. ते हे जग सोडून गेले. पाठोपाठ काही महिन्यानंतर माई देखील गेल्या. तिकडे मकरंदचं स्वप्न पूर्ण होत होतं. त्याने गावी जायचं ठरवलं. गावी जाताच कधी आण्णा आणि माईला भेटतो असं झालं होतं. वाड्याला भलं मोठं कुलूप पाहून तो तिथंच थबकला. तो गोपाळच्या घरी गेला. कितीतरी वर्षांनंतर समोर गोपाळला पाहून मकरंदच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. पण पुढच्याच क्षणाला माई-आण्णाविषयी समजताच तो हुंदके देत रडू लागला. तो हळवाही तेवढाच होता. वाड्यात गेल्यावर उफाळून येणाऱ्या आठवणीला सामोरं जाण्याचं धाडस त्याच्यात नव्हतं. तो आल्या पावली तसाच परतला. मकरंद पोरका झाला होता आणि त्या क्षणापासून तो वाडाही!
माई-आण्णाला सुख नाही देऊ शकलो, ही सल कायमच त्याच्या आत खुपत राहिली. आजही कधी गावाकडचं नाव काढलं, की तो अस्वस्थ होतो. “बाबा, कसला विचार करताय?’ मकरंदने एक फोन केला. “गोपाळ, मी बोलतोय. आम्ही येतोय उद्या तुझ्याकडे.’ हे ऐकून सुधा आणि जुई मनोमन खूश झाल्या. “जुई, दोन दिवसासाठी चाललोय आपण. किती बॅगा घेतल्यात!’ “बाबा, दोन की चार दिवस ते तिथं गेल्यावर पाहू. प्रवास चालू झाला. गाव जसजसं जवळ येत होतं तशी मकरंदच्या आठवणीतल्या गाठोड्यातील एक-एक जिन्नस समोर येत होती. फाट्यावरच्या बाभळीचा काटा पायात रुतला की, खांद्यावर घेणारे आण्णा एकदम डोळ्यासमोर आले. आज त्या बाभळीने काटा न टोचता डोळ्यात टपकन पाणी आणलं होतं! त्या वेदनेत एक वेगळीच “आर्तता’ गुंफलेली होती. आतल्या जखमेवरची खपली निघाली; पण “तो’ काटा मात्र कायमचाच रुतून बसला होता!
रस्त्याने जाणाऱ्या ऊसाच्या ट्रॅक्टरमागं पळत येऊन कांडे ओढणाऱ्या पोरांकडं पाहून, त्याच्या हिरमुसलेल्या चेहऱ्यावर अचानक हसू आलं. “जुई, मी आणि गोप्या पण हे असंच ऊस चोरायचो. आण्णांना समजलं तेव्हा त्याच उसाने पायावर वळ उठेपर्यंत मार खाल्ला होता. ते वळ मनावर असे काही उठले की, मी आयुष्यात पुन्हा कधीच चोरी नाही केली.’ “हो बाबा. म्हणूनच तुम्ही एवढं नाव कमावलं.’ गाडी वेशीतून आत गेली. संध्याकाळी घराकडे परतणाऱ्या जनावरांच्या गर्दीतून वाट काढताना, मकरंद विंडोतून हात काढत त्यांना स्पर्श करत होता. गळ्यातल्या घंटीमधून उमटणाऱ्या नादात त्याने मोठ्याने सूर लावला. “चल सर्जा, चल राजा, बिगी बिगी बिगी जायाचं…’ दोघी माय-लेकी हसू लागल्या.
गोपाळ दारातच उभा होता. त्याने मकरंदला कडकडून मिठी मारली. रात्री जेवण झाल्यानंतर, अंगणात शेकोटीला बसून यांच्या गप्पाटप्पा चालू होत्या. मधेच दुरून टाळ आणि पखवाज वाजल्याचा आवाज कानावर पडला. “अजूनही कीर्तन होतात?’ “हो. आणि ते संपलं की, आजही खडीसाखर आणि रेवडीचा प्रसाद मिळतो.’ जुन्या आठवणी सांगताना दोघेही हरवून गेले होते. “बाबा, चला ना मंदिरापर्यंत जाऊन येऊ.’ मंदिराकडे जात असताना मकरंदची पावलं वाड्यासमोर थबकली. दिवळीत ठेवलेल्या पणतीच्या मिणमिणत्या उजेडात दारावर पाटी दिसली.
“सावली.’ त्याने गोपाळला विचारलं. “गोपाळ, वाड्याबाहेर ही पाटी?’ गोपाळने जुईकडं पाहिलं. “सांगतो. चल ये.’ गोपाळने कुलूप उघडून दार आत ढकललं. उंबरठा ओलांडून घराबाहेर पडलेली मकरंदची पावलं आज पुन्हा तो उंबरठा चढताना काहीशी थरथरत होती. समोर तुळशीवृंदावनात लावलेला दिवा, पडवीत लावलेली पणत्यांची आरास पाहून तो पार गोंधळून गेला होता. “गोपाळ, हे काय आहे सांगशील का?’ “सगळं सांगतो. जरा धीर धर.’ ते आत गेले. बैठकरूममध्ये आरामखुर्ची, बाजूलाच ठेवलेला पान-सुपारीचा डब्बा, भिंतीवरचं टोल देणारं लाकडी फ्रेममधलं घड्याळ, मधेच उभ्या असलेल्या खांडाला अडकवलेला रेडिओ पाहत तो तसाच स्वयंपाकघरात गेला. भिंतीवरची फरताळं, त्यावरची पितळेची भांडी, कोपऱ्यात रचलेली उतरंड तो पाहतच राहिला. माजघरात डोकावताना खुंटीवर लटकवलेली माईची साडी बघून एवढा वेळ आत दाबून ठेवलेला अश्रूंचा बांध बाहेर पडला. “गोपाळ, सांग रे आता तरी. थरकाप होतोय माझा हे सगळं बघताना.’
जुईने मकरंदचा हात हातात घेतला. “बाबा, मी सांगते. त्यादिवशी तुमचं पुस्तकांचं कपाट आवरत असताना बाजूला एक संदूक दिसली. पुस्तकं असतील म्हणून पाहायला गेले, तर आत तुमचे नाटकाचे कपडे आणि इतर साहित्य होतं. त्यात चापून पाहताना हाताला एक डायरी लागली. त्यावर माई-आण्णा एवढंच लिहिलं होतं. मी ती उघडून वाचू लागले. मला वाचताना जाणवलं की, त्या काळात तुम्ही माई-आण्णा पासून शरीराने फक्त दूर होता. तुमच्या जगण्यातला असा एकही क्षण नव्हता जो तुम्ही त्यांच्या आणि या वाड्यातल्या आठवणींशिवाय जगला. मी तेव्हाच ठरवलं. गावी जाऊन वाडा पुन्हा उघडायचा. माझ्या हाताला वेचता येतील तेवढे तुमचे हरवलेले क्षण वेचून, पुन्हा तुमच्या स्वाधीन करायचे.’ मकरंद पाणावलेल्या डोळ्यांनी जुईचं बोलणं ऐकत होता.
अमोल भालेराव