मुंबई : भारताचे माजी कसोटी क्रिकेटपटू बापू उर्फ रमेशचंद्र गंगाराम नाडकर्णी यांचं शुक्रवारी मुंबईत राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले आहे. ते ८७ वर्षांचे होते. आज (शनिवारी, ता.१८) शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
Former India all-rounder Bapu Nadkarni, best known for bowling 21 consecutive maiden overs in a Test match, passed away in Mumbai on Friday. #CRICKET #BCCI
— Press Trust of India (@PTI_News) January 17, 2020
बापू हे १९५५ ते १९६८ यादरम्यान भारतीय कसोटी संघात होते. फिरोजशहा कोटला मैदानावर १६ डिसेंबर १९५५ रोजी न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात बापूंनी आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. भारतीय क्रिकेट संघाकडून बापू ४१ कसोटी सामने खेळले. त्यात त्यांनी ८८ विकेट आपल्या नावे केल्या. तसेच फलंदाजीतही १ शतक व ७ अर्धशतकांसह १ हजार ४१४ धावा त्यांच्या नावावर आहेत. विशेष म्हणजे कसोटी कारकिर्दीतील अखेरचा कसोटी सामनादेखील बापूनी न्यूझीलंडविरुद्धच (७ ते १२ मार्च १९६८, आॅकलंड) खेळला.
सातत्याने सर्वाधिक २१ षटके निर्धाव टाकण्याचा विश्वविक्रम त्यांच्या नावे आहे. विशेष म्हणजे त्यांचा हा विक्रम अद्यापही अबाधित आहे. बापू नाडकर्णी यांनी इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात पहिल्या डावात एका दिवसात २९ षटके गोलंदाजी केली होती. यात २६ षटके ही निर्धाव होती. त्यांनी यादरम्यान केवळ तीनच धावा दिल्या होत्या.
बापू नाडकर्णी यांच्या निधनानंतर अनेक क्रिकेटपटूसह राजकीय नेत्यांनी ट्विटवरून शोक व्यक्त केला असून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.