काळ जसा बदलत जातो तसे काही प्रथांमध्ये बदल होत जातात. ज्या प्रथा आणि परंपरा चुकीच्या आहेत, त्यात योग्य तो बदल होणे आवश्यक ठरते. मात्र, आजही काही चुकीच्या प्रथा अधिक प्रखरतेने समाजात आपले अस्तित्व टिकवून आहेत. सती, केशवपन या प्रथा आपण सोडून दिल्या असल्या तरी बालविवाह आणि हुंड्यासारख्या अनिष्ठ प्रथा आपल्याकडे राजरोसपणे पाळल्या जातात. विशेषतः माणूस अधिक शिकून प्रगती आणि विकासाच्या मार्गावरून मार्गक्रमण करू लागलाय, हे जरी खरे असले तरी तो जितका अधिक शिकतो तितका अधिक हुंडा घेतो अशी समकालीन काळाची स्थिती आहे. जिथं जास्त शिक्षणतिथं जास्त हुंडा, असा विरोधाभास आपल्याला पहावयास मिळतो.
नोकरदार, डॉक्टर, इंजिनियर, प्राध्यापक व सरकारी नोकरदार या चढत्या पद्धतीने हुंड्याचे आकडे वाढताना दिसतात.
जनावरांच्या बाजारातील बोलीप्रमाणे मुलांची लग्नाच्या बाजारात हुंड्यासाठी बोली लावली जाते. हे संपूर्ण महाराष्ट्रभर (काही अपवाद वगळता) पाहायला मिळते. मी माझ्या मुलीला हुंडा दिला आहे तर मी माझ्या मुलालाही हुंडा घेणार! हा जणू अलिखित नियम सर्व पालक वर्गाकडून कमीअधिक प्रमाणात पाळला जातो. बदलाची सुरूवात स्वत: पासून करावी म्हणणारी मानवजात स्वत: वर वेळ आली की निर्णय घेण्यास तितकीशी उत्सुक दिसत नाही. कारण सगळ्यांना कष्ट न करता पैसा, वस्तू आणि त्यात पुन्हा आपल्या पसंतीचं सर्वकाही मिळत असतं! लग्नाच्या बाजारात अनेक मागण्या वधुपक्षाकडून पूर्ण झाल्या नाहीत वा मनासारखे मानपान झाले नाहीत तर विवाहितेचा विविध प्रकारे छळ केला जातो. नव्याचे नऊ दिवस सगळं ठीक असतं मात्र, पुन्हा सगळे रंग दिसू लागतात! यातून नवविवाहितेस अनन्वित अत्त्याचाराला सामोरे जावे लागते. यातून तिला आत्महत्येसाठी प्रवृत्त केलं जातं. आपण महाराष्ट्राला पुरोगामी म्हणतो, मात्र महाराष्ट्रही याला अपवाद नाही.
भारतीय संस्कृतीला एकसंध ठेवण्यात विवाह संस्थेचे महत्वपूर्ण योगदान आहे. एकीकडे हुंडाबळीच्या घटना दररोज ऐकण्यात आणि वाचण्यात येतात तर दुसरीकडे आपल्या लग्नासाठी वडिलांची परिस्थिती नाही म्हणून आत्महत्या करणाच्या घटना आजही घडताहेत. आजही काही मिनिटाला आपल्या देशात हुंडाबळी जातो. हुंडा प्रतिबंधक कायद्यान्वये, हुंडा देणे आणि घेणे गुन्हा असला तरी आपली मुलगी सुखात राहावी म्हणून वरपक्षाचे सर्व लाड वधूपक्षाकडून पुरविले जातात. हे थांबले पाहिजे, यासाठी तरुणांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे.
– श्रीकांत येरूळे