महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणाऱ्या नद्यांची पात्रे बुजविल्यामुळे अत्यंत अरुंद झाली आहेत. नुकत्याच झालेल्या पावसाळ्यात त्याचा प्रत्ययही आला. त्यानंतरही शहरातून वाहणाऱ्या पवना नदीचे पात्र बुजविण्याचा उद्योग राजरोसपणे सुरू असताना पालिका प्रशासन मात्र दुर्लक्ष करीत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. नदीचे पात्र आणखी कमी झाल्यास पुराची तीव्रता वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातून मुळा, पवना आणि इंद्रायणी या नद्या वाहतात. शहरातून वाहणारी पवना ही सर्वाधिक लांबीची नदी आहे. तर मुळा व इंद्रायणी या महापालिकेच्या हद्दीतून वाहणाऱ्या कमी लांबीच्या नद्या आहेत. चिंचवड, काळेवाडी, पिंपरी, कासारवाडी, सांगवी, दापोडी परिसरातून पवना नदी वाहते. या नदीच्या पात्रात ठिकठिकाणी मातीचे ढिगारे टाकून नदीपात्र अरुंद करण्यात आले आहे. त्यामुळे मावळात पाऊस पडल्यानंतर नदीपात्राच्या कडेला पुराचा धोका निर्माण होतो. त्यातच नदीपात्रालगत मोठ्या प्रमाणात झोपडपट्ट्या वाढल्या आहेत. ऑगस्ट 2019 मध्ये पवना नदीला मोठा पूर आल्याने दहा हजारांहून अधिक नागरिकांना विस्थापित व्हावे लागले होते. नदीचे पात्र अरुंद झाल्यानेच पूर आल्याचा निष्कर्ष काढण्यात आला होता.
त्या वेळीही नदीपात्रात टाकण्यात येणारा राडारोडा आणि अरुंद होणाऱ्या नदीपात्रावरून मोठी चर्चा रंगली होती. नदीपात्र अरुंद होणार नाही, राडारोडा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याबरोबरच अतिक्रमणे हटविण्याबाबत पालिका प्रशासनाने भूमिका घेतली होती. मात्र, पूर ओसरल्यानंतर पालिका प्रशासनाला आपल्या भूमिकेचाही विसर पडला आहे. शहरात पुन्हा ठिकठिकाणी नदीपात्र बुजविण्याचा प्रकार राजरोसपणे सुरू झाला असून, त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने या प्रकारात वाढ झाली आहे.
रविवार सकाळपासूनच चिंचवड ते काळेवाडीदरम्यान वाहणाऱ्या पवना नदीपात्राच्या लगत राडारोडा टाकून पात्र अरुंद करण्याचा प्रकार चालू होता. गेल्या महिनाभरापासून नदीपात्रालगत राडारोडा आणून टाकण्यात आला होता. आज (दि. 12) हा राडारोड जेसीबीच्या साहाय्याने नदीपात्रात लोटून पात्र अरुंद करण्यात आले. गेल्या काही महिन्यांपासून महापालिकेच्या सुटीचा दिवस गाठून नदीपात्र अरुंद करण्याचा प्रकार सुरू आहे. या ठिकाणी असलेले महापालिकेचे बीट निरीक्षक, कनिष्ठ अभियंते, उपअभियंत्यांसह कार्यकारी अभियंत्यांचेही आशीर्वाद नदीपात्र बुजविणाऱ्यांवर असल्याचे सांगण्यात आले. सर्वसामान्य नागरिकांनी या प्रकाराला विरोध केल्यास दमदाटीचेही प्रकार घडले आहेत.
तात्काळ गुन्हा दाखल करा – ऍड. दत्ता झुळुक
शहरातील नद्यांची पात्रे अरुंद करून त्यावर अतिक्रमणे करणे, टपऱ्या-टुपऱ्या टाकून भाडे उकळणे असे प्रकार सुरू आहेत. महापालिका प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन तात्काळ कारवाई करावी तसेच गुन्हा दाखल करावा अन्यथा न्यायालयात दावा दाखल केला जाईल, असा इशारा ऍड. दत्ता झुळुक यांनी दिला आहे. झुळुक यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, नदीपात्र अरुंद झाल्याने नदीकाठच्या नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. महापालिका अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने हा प्रकार सुरू आहे. याबाबत महापालिका प्रशासनाने तात्काळ कारवाई करून ज्या लोकांनी नदीपात्र बुजविले आहे त्यांच्याकडून ते रिकामे करून घ्यावे, पात्र बुजविणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून दंड आकारावा व असा प्रकार पुन्हा होऊ नये यासाठी दक्षता घ्यावी.