कसला विचार करताय?’ गच्चीत उभा राहून एकटक अंगणातल्या झाडाकडं पाहणाऱ्या केशवने मुक्ताचं बोलणं ऐकून न ऐकल्यासारखं केलं. मुक्ताने त्याच्या खांद्यावर हात ठेवत पुन्हा विचारलं. “मघापासून बघतेय. कसल्या विचारात अडकलाय?’ “विचारात नाही. बंधनात. त्या समोरच्या अवाढव्य पिंपळात अडकून पडलेल्या फांदीसारखं. तोडायचं म्हटलं तरी पाश काही तुटत नाही.’ केशवला काय म्हणायचं ते मुक्ताला समजलं होतं. “एक बोलू का?’ “हं.’ “खरंच का तुम्हाला ओझं वाटतंय, आप्पा आणि माईंचं?’ “ओझं नाही; पण..’ तो पुढे काही बोलणार; इतक्यात दार वाजल्याचा आवाज आला. मुक्ताने दार उघडलं. “माई, तुम्ही!’ “अगं, खाली प्रभाकर आणि दिनू भाऊजी आलेत. केशवला खाली बोलावलंय.’ “अगं, मग आवाज द्यायचा खालूनच. कशाला जिना चढत वर यायचं. बरं, तू हो पुढे. आलोच.’
प्रभाकर आणि दीनानाथ हे वसंतरावांचे म्हणजेच आप्पांचे जिवलग मित्र. काहीवेळाने केशव आणि मुक्ता खाली आले. “काका नमस्कार करतो.’ केशवच्या पाठीवर हात ठेवत, “केशवा, हल्ली दर्शन दुर्लभ झालंय तुझं. त्यादिवशी सायकलवर मागे तंबोरा घेऊन जाताना पाहिलं होतं.’ “हो. तानपुऱ्याची जवार काढायला गेलो होतो.’ “चला, म्हणजे आज मैफील रंगणार तर. आज होऊनच जाऊ दे. काय म्हणतो वसंता?’ आप्पाने केशवकडे पाहून विचारलं. “देशील का साथ?’ “वसंता, अरे तो नाही का म्हणणार आहे? काय केशव?’ केशवने कोपऱ्यात गुंडाळून ठेवलेला तानपुरा बाहेर काढला. आधीच नीटनेटकी असलेली बैठक आप्पांनी पुन्हा काहीशी झटकून घेत घसा थोडासा खाकरून घेतला. केशवने तानपुऱ्याच्या खुंट्या पिरगाळत दोरे खालीवर केले आणि तारांना छेडून पाहिलं.
तानपुऱ्याच्या तारेवर बोटं उमटवताच आप्पा डोळे मिटून गाऊ लागले. बराच वेळ ते आपल्याच तंद्रीत गात राहिले. स्वरांची मखमली मोरपिसं अलगदपणे कधी हृदयाला स्पर्शून जायची; तर कधी मनाच्या हिंदोळ्यावर स्वार होत दूर कुठंतरी विरून जायची. काहीवेळाने आप्पांनी भैरवी म्हणत मैफिलीची सांगता केली आणि आपले डोळे उघडले. “व्वा! वसंता, तुझ्या कंठात खरंच सरस्वती वसते. आणि केशव, तानपुऱ्यावर सळसळणारी तुझी बोटं पाहून आम्ही भरून पावलो.’ केशवने हलकंच हसल्यासारखं करत नम्रपणे हात जोडले आणि तानपुऱ्यावर नतमस्तक होत तो पुन्हा कोपऱ्यात ठेवून दिला. “अगं ऐकलंस का?’ केशवने आवाज दिला. तेवढ्यात मुक्ता स्वयंपाकघरातून बाहेर आली. “घ्या. तुम्हा सगळ्यांसाठी गरमागरम चहा.’ “अरे व्वा! सुनबाई, तुम्ही तर आधीच तयारी केली होती.’ “दिनूकाका, रागातलं फार काही कळत नसलं तरी आप्पांची भैरवी ऐकताना त्यांचा स्वर उताराला लागला; की तिकडे आम्ही चहाचं भांड शेगडीवर चढवलंच म्हणून समजा.’ मुक्ताचं बोलणं ऐकून सगळेच हसू लागले. तशी मुक्ता बोलायला अगदी लाघवी. म्हणायला ती आप्पा-माईंची सून होती; पण मुलीची उणीव तिने भरून काढली होती.
“बरं, वसंता आम्ही निघतो.’ आप्पा ओटीवरच्या झोपाळ्यावर येऊन बसले. केशव तिथंच काहीसा घुटमळत होता. इकडून तिकडे दोन-चार येरझाऱ्या घातल्या आणि आप्पांसमोर उभा राहिला. काहीशा कापऱ्या आवाजात तो बोलू लागला. “आप्पा, मला काही बोलायचंय.’ “बोल केशव.’ “आप्पा, मी शहरात जाईल म्हणतो. गाणं सोडायचंय मला.’ हे ऐकून आप्पांनी जमिनीवर पाय टेकवत झोपाळा थांबवला. जिन्यावरून जाणाऱ्या मुक्ताची पावलं तिथंच थबकली. उंबऱ्यापाशी भिंतीला टेकून उभ्या असलेल्या माईने अजीजीच्या स्वरात विचारलं. “केशव, हे काय बोलतोस? काय करणार शहरात जाऊन?’ “काहीही करेल; पण दोन-चारशे रुपयांच्या बिदागीसाठी इथपासून पुढं तानपुरा हातात नाही घेणार.’ आप्पा शांत होऊन फक्त ऐकत होते. “माई, तुमचं ते तुमचं; पण माझं आयुष्यसुद्धा खंगलय. वर्ष-वर्ष अंगाला नवीन कपडा नाही की कसली हौस नाही.
आप्पा, माझं सोडा कधी माईच्या अंगावर नवीन साडी घातलीय का हो तुम्ही? शेत विकलं, गाडी विकली, हे कमी पडलं म्हणून की काय माईच्या अंगावरचे दागिनेसुद्धा विकले! कुणासाठी? त्या बाईसाठीच ना? आजवर बोललो नाही; पण आज विचारतो. गेली कित्येक वर्षे तुम्ही दर महिन्याच्या शेवटी तालुक्याला जाता. तिथं इस्पितळात पडून असलेल्या कुण्या एका बाईसाठी दवापाणी करता. कोण लागते ती बाई तुमची? काय नातं आहे तिचं तुमच्याशी? तुम्ही माईला फसवू शकता मला नाही. मी स्वतःच्या डोळ्याने पाहिलंय.’ पुढच्याच क्षणी माईने मागचा पुढचा विचार न करता केशवच्या कानशिलात लगावली. “तुझी जीभ कशी सडली नाही असं घाणेरडं बोलताना?’ माईचं अंग थरथरत होतं. आप्पांनी माईला हाताला धरून खाली बसवलं. मुक्ताने पहिल्यांदाच माईंचं हे रूप पाहिलं होतं. तिच्याही मनात भावनांचा एकच कल्लोळ माजला होता. रातकिड्यांच्या किर्रर्र आवाजातली ती रात्र सरता सरत नव्हती.
दिवस उजाडला. “तुला शेवटचं विचारतोय. येणार आहेस का माझ्याबरोबर?’ “अहो, असं अविचारीपणे नका वागू. गिळून टाका तो राग.’ केशव तडातडा खाली आला. तो घराबाहेर पडणार इतक्यात समोरून प्रभाकर आणि दीनानाथ आले. “वसंता कुठंय?’ दीनानाथचा आवाज ऐकून आप्पा बाहेर आले. “वसंता, एक वाईट बातमी. मंगल नाही राहिली या जगात. आज पहाटेच गेली. इस्पितळातून फोन आला होता.’ माईने डोळ्याला पदर लावला आणि हुंदके देत रडू लागली. “सुटली एकदाची. आम्ही आलोच तिला घेऊन.’ म्हणत आप्पा बाहेर पडले. या चौघांशिवाय मंगल कोण होती, हे कोणालाच माहीत नव्हतं. केशवने बॅग खाली ठेवली. “काल मी सांगत होतो ती हीच बाई. बरं झालं गेली. तुझ्यामागची पीडा गेली एकदाची.’ माईने इतकी वर्षे आत दाबून ठेवलेलं वैफल्य तिच्या ओक्साबोक्सी रडण्यातून बाहेर पडू लागलं.
माई रडतारडता दाटलेल्या कंठाने शेवटी बोललीच. “केशव, नको रे असं बोलूस. आई होती ती तुझी. जन्म दिलेली आई.’ माईने केशवला आपल्या छातीशी धरलं आणि पुन्हा तिचा अश्रूंचा बांध फुटला. मुक्ता आणि केशव दोघे एकमेकांकडे पाहात होते. “माई, तू काय बोलतेस?’ “खरं तेच सांगते. आमच्या लग्नानंतर मला दिवस गेले होते. त्यादिवशी आम्ही गाडीने दवाखान्यात निघालो होतो. रस्त्यात एक बाई तिच्या मुलाला हाताला धरून गाताना भीक मागत होती. समोरून मोठं वाहन आलं म्हणून ते चुकवायला गेले; पण जोराची धडक त्या बाईला बसली. तिला तसंच गाडीत टाकून दवाखान्यात नेलं. डोक्याला मोठा मार बसल्याने ती बिचारी कोमात गेली ती कायमचीच.
पाण्यासारखा पैसा ओतला; पण सगळं व्यर्थ. माझ्याही पोटाला मार लागल्याने डॉक्टराने बाळ पोटातच दगावल्याचं सांगितलं. तुझे आप्पा त्या क्षणापासून स्वतःला अपराध्यासारखं समजायचे. यांनी ठरवलं, ज्या माऊलीचा गळा एवढा सुंदर आहे तिच्या वंशाला आपण गाणंच शिकवायचं. आम्ही मूल नाही होऊ द्यायचं ठरवलं आणि तिच्या बाळाला पदरात घेतलं. केशव, त्यादिवशी माझ्या झोळीत मी तुलाच घेतलं होतं! अभाग्यासारखं वाटतंय आज तुला हे सगळं सांगताना.’ बोलता-बोलता माई खाली कोसळल्या. केशवने माईचं डोकं आपल्या मांडीवर ठेवलं आणि पाणी पाजलं. काहीवेळाने दिनूकाका आले. “सगळी तयारी झाली. माई चला. केशव तू…’ दिनूकाकाचं बोलणं पूर्ण होण्याआधीच केशव धावत स्मशानभूमीकडं निघाला. सरणावर ठेवलेल्या आपल्या आईला कवटाळून केशव ढसाढसा रडू लागला.
माईच्या डोळ्यात दडलेलं “शेवटचं सत्य’ केशवच्या डोळ्यातून वाहताना आप्पांना दिसत होतं. केशवने चितेला अग्नी दिला. चितेच्या पलीकडे उभ्या असलेल्या एका आईची कूस आज पुन्हा रिकामी झाली होती आणि आपल्या मुलाला अनाथ करून “तिचा’ धगधगत्या सरणावरचा शेवटचा प्रवास चालू झाला होता…!
अमोल भालेराव