कृषी विद्यापीठात मागोवा आणि रब्बी शेतकरी मेळावा
नगर – कृषि विद्यापीठे संशोधनाची महत्त्वाची केंद्रे असून सर्वांना विशेष करून पुढील पिढीला शुध्द व विषमुक्त अन्न मिळावे, यासाठी कृषि विद्यापीठांनी संशोधन करावे, विषमुक्त कृषि उत्पादन ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज राहूरी येथे केले.
राहूरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठात मागोवा – 2019 आणि रब्बी शेतकरी मेळाव्याचे आयोजन डॉ. नानासाहेब पवार सभागृहात करण्यात आले होते.
त्यावेळी ना. थोरात बोलत होते. यावेळी कृषिमंत्री दादा भुसे, आमदार लहू कानडे, आमदार प्रकाश गजभिये, कुलगुरु डॉ. के.पी. विश्वनाथा, महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक विश्वजित माने, निविष्ठा व गुणवत्ता नियंत्रण संचालक विजय घावटे, मृद संधारण व पाणलोट विकास संचालक कैलास मोते, संशोधन व विस्तार शिक्षण संचालक डॉ. शरद गडाख यावेळी उपस्थित होते.
ना. थोरात म्हणाले, विषमुक्त कृषि उत्पादने ही नवीन क्रांती आहे. शास्त्रज्ञांनी पिकांचे नवीन वाण शोधल्यावर शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पादन वाढीसाठी त्याच्या उपयोगाची माहिती विद्यापीठांनी देऊन मार्गदर्शन करावे. ना. भुसे म्हणाले, विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांच्या दारापर्यंत जाऊन त्याला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी संशोधन करावे. शेतकरी हा मुख्यमंत्र्यांचा केंदबिंदू असल्याने शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन त्यांनी केले. डॉ. विश्वनाथा यांनी मागील वर्षी केलेल्या कार्याची माहिती दिली.
विद्यापीठाच्या उद्यान विद्या विभागाच्या वतीने गो संशोधन व विकास प्रकल्प, दख्खनी मेंढी सुधार प्रकल्प, संगमनेरी शेळी सुधार प्रकल्प, सीड टेक्नॉलॉजी आदी विषयांवर आयोजित मागोवा-2019 प्रदर्शनाचे उद्घाटन ना. थोरात यांच्या हस्ते झाले. कृषि उत्पादने तसेच कृषि अभियांत्रिकी उत्पादन वस्तू येथे प्रदर्शित करण्यात आल्या होत्या. ज्वारी सुधार प्रकल्प परिसरात शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले. ना. थोरात, मृद व जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख शिवार फेरीमध्ये सहभागी झाले.