बांधकाम विभाग अपघात घडण्याची वाट पाहतेय का?
नगर – नगर-पुणे महामार्गावर रेल्वे उड्डाणपुलावर दहा-बारा दिवसांपूर्वीच बस व ट्रकचा समोरासमोर झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर 13 ते 14 जण गंभीर जखमी झाले होते. या अपघातात पुलाचे कठडे तुटले असल्याने, संबंधित विभागाने तात्पूर्त्या स्वरूपात लोखंडी कठडे उभे केले असून, तेही धोकादायक आहेत. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता वर्तविली जात असून, संबंधित विभागाने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
नुकत्याच दहा-बारा दिवसांपूर्वी जामखेड आगाराची बस नगरहून पुणेकडे व पुणेहुन नगरकडे येणाऱ्या ट्रकचा समोरासमोर अपघात झाला. या अपघातात 2 ठार तर 13 ते 14 जण गंभीर जखमी झाले होते. अपघातामुळे महामार्गावर दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अपघातामुळे पुलाचे कठडे तुटल्याने दुचाकीस्वार पुलावरून खाली पडल्याचेही बोलले जात होते. मात्र अद्यापही त्या पुलाच्या कठड्याचे काम संबंधित विभागाने केले नसून त्याठिकाणी तात्पूर्त्या स्वरूपात लोखंडी कठडे उभे केले आहे.
त्यामुळे या ठिकांणी पुन्हा अपघात होण्याची शक्यता वर्तविली जात असून संबंधित विभागाने ते कठडे दुरुस्त करावे अशी मागणी नागरिकामधून होत आहे.