राजकारणाचे संतुलन बिघडले
पिंपरी – महाविकास आघाडीच्या सरकारला खाली खेचण्याचा कुठलाही प्रयत्न भारतीय जनता पक्षाचा नाही. या सरकारला पाडण्यासाठी बाहेरून कोणीही काहीही करावे लागणार नाही, यांची तीन पायांची शर्यत खेळताना लवकरच दमछाक होईल, असा टोला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला. “निसर्गाचे जसे संतुलन बिघडले आहे तसे राजकारणाचेही संतुलन बिघडलं आहे’, अशा शब्दात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्याच्या सध्याच्या राजकीय स्थितीवर भाष्य केले. यापुढे नागरिक मतदान करताना जास्त विचार करतील असेही त्यांनी स्पष्ट केले.
पिंपरी-चिंचवड भाजप शहराध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर शहर पदाधिकाऱ्यांची बैठक रविवारी (दि. 5) पिंपरी येथे झाली. तत्पूर्वी ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की, विरोधासाठी विरोध करणारी माणसं आम्ही नाही. मंत्रीमंडळ खातेवाटप झाल्याबाबत आनंद आहे. मंत्र्यांनी आता उत्तम काम करावीत. नागरिकांच्या अडचणी समजून मार्ग काढावा.
काही राज्यात उलटेसुलटे राजकारण चालते. महाराष्ट्रात खूप प्रामाणिकपणाचं राजकारण व्हायचे, पण यावेळी काय झाले हे माहीत नाही. अवेळी पाऊस झाला, गारा पडल्या, त्या जशा अनाकलनीय आहेत. तसेच महाराष्ट्रातील राजकारण नागरिकांना अनाकलनीय आहे. नव्याने जेव्हा निवडणूक लढाल तेव्हा लोकांना माहीत आहे, कोणाला मतदान करायचं आणि कोणाला नाही. त्यामुळे नागरिकांनी निराश न होता अधिक सतर्क झाले पाहिजे. भाबडेपणाने मतदान करून चालणार नाही. जसे निसर्गाचे संतुलन बिघडले आहे, तसे राजकारणाचे देखील संतुलन बिघडले आहे. नागरिक आता अधिक विचारपूर्वक मतदान करतील. जातीचे, पैशांचे राजकारण संपेल, असा आशावादही पाटील यांनी व्यक्त केला.
राज्यातील शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेस- कॉंग्रेस महाविकास आघाडी सरकारला खाली खेचण्याचा कुठलाही प्रयत्न भाजप करणार नाही. प्रबळ विरोधी पक्ष म्हणूनच भाजप काम करेल, असे मत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.
चित्ररथ कंटाळवाणे होऊ शकतात
प्रजासत्ताकदिनी राजधानी दिल्लीत महाराष्ट्राचा चित्ररथ दिसणार नसल्याने राज्यात त्यावरून राजकारण सुरू आहे. आरोप – प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. चित्ररथावर बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले, कशाचेही खापर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर फोडले जात आहे. चित्ररथाचा विषय तांत्रिक आहे. महाराष्ट्राचा चित्ररथ या पूर्वीही अनेकदा नव्हता. कारण ते “रोटेशन’ पद्धतीने ठरवलं जातं. दरवर्षी तीस ते चाळीस टक्के राज्यांचे चित्ररथ येतात. यंदा तांत्रिकरित्या महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल “रोटेशन’मधून बाहेर पडले. बऱ्याच देशांचे प्रतिनिधी प्रजासत्ताक दिनाचा सोहळा पाहायला येत असतात, सगळ्या राज्याचे चित्ररथ कंटाळवाणे होऊ शकतात’, असे तार्कीकही पाटील यांनी मांडले.