प्रत्येक घराच्या अंगणात किंवा दारात एक छोटेसे का होईना पण तुळशीचे रोपटे असणे ही आपल्या संस्कृतीची खूण आहे. दारातल्या तुळशीला आपल्याकडे धार्मिक, आयुर्वेदिक आणि कौटुंबिक महत्त्व आहे.
ती एक जशी औषधी वनस्पती आहे तसेच तिचे धार्मिक, देवकार्यातील, पूजनातील महत्त्वही अनन्यसाधारण असेच आहे. तुळस ही श्री महाविष्णू, गोपालकृष्ण, पांडुरंग ह्यांना अतिशय प्रिय आहे. विष्णूपूजन तर तुलसीदल पूजना शिवाय पूर्णच होत नाही. तुळशीचेच दुसरे नाव विष्णूप्रिया असेही आहे.
देव पूजेत, नैवेद्याच्या ताटावर, दान दक्षिणे सोबत तुलसी पत्र अर्पण करणे हे खऱ्या समर्पण भावाचे प्रतीक मानले जाते. विष्णूू सहस्त्रनामासह तुलसी अर्पण करणे हा एक विशेष पूजनाचा भाग आहे. तुळस शुद्ध, निर्मळ, पवित्र आणि वंदनीय आहे.
सकाळ संध्याकाळ घरातल्या स्त्रीने तुळशीची पूजा करायची. तिला प्रदक्षिणा घालायच्या, आपल्या घराचे दु:ख, दारिद्य्र आणि वाईटशक्तीपासून संरक्षण करण्याची तिला प्रार्थना करायची, सर्वांसाठी उत्तम आरोग्याचे वरदान मागायचे हा तर पूर्वीपासून चालत आलेला परिपाठच आहे.
तुळस ही औषधी वनस्पती असून ती सर्दी पडसे, खोकला, ताप, कणकण, दमा, दातदुखी, मुख दुर्गंधी, अपचन, तोंडाला चव नसणे, ह्या सारख्या छोट्या आजारांवर जशी अत्यंत गुणकारी आहे.तशीच ती कर्करोग, ट्यूमर, हृदयरोग यावरही गुणकारी आहे. तुळशीचा काढा, पानांचा मधातून घेतलेला रस, नुसती चावून खाल्लेली पाने ह्यांचा खूप चांगला उपयोग होतो. एक घरगुती प्रभावी औषधोपचार म्हणूनही तुळस प्रभावी ठरते. तुळशीची पाने चुरून किंवा तिची माती त्वचारोगावर गुणकारी आहे. तुळस ही वनस्पती अशी आहे की ती सभोवतालचा परिसर शुद्ध करण्यास मदत करते.
वारकरी सांप्रदायांनी तर तुळशीची माळ गळ्यात घालून तिला अगदी आपल्या हृदयाशी कवटाळले आहे. तुळशीचा हार हा पांडुरंगाच्या गळ्यातील एक भूषण आहे. कार्तिक महिन्यात केले जाणारे तुलसी विवाह पूजन हे कन्यादानाचे पुण्य बहाल करणारे आहे असे मानले जाते.
दारातली तुळस आणि त्या तुळशीचे श्रद्धेने केले जाणारे पूजन हे उपासकास सुख, शांती, धनसंपत्ती आणि आरोग्य प्रदान करणारे ठरते. या बाबत कोणाचेच दुमत असण्याचे कारण नाही. आपल्या संस्कृतीचा वारसा हा असा घरादारात आणि आपल्या मनात जपताना तुम्हा आम्हा एक सात्विक समाधान प्राप्त झाल्याशिवाय नक्कीच राहणार नाही.
– अरुण गोखले