लाराकडून गौरवोद्गार
नवी दिल्ली – विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ कोणताही चमत्कार करु शकतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या प्रत्येक स्पर्धा जिंकण्याची क्षमता कोहलीच्या संघाकडे आहे, अशा शब्दात वेस्ट इंडीजचा महान क्रिकेटपटू ब्रायन लारा याने गौरवोद्गार काढले आहेत.
कसोटी क्रिकेटमधील वैयक्तिक सर्वोच्च 400 धावांचा विक्रम मोडण्याची क्षमता ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर, भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि आक्रमक सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा या खेळाडूंमध्ये असल्याचेही लाराने सांगितले.
भारतीय संघाचे कौतुक करताना कोहलीचा संघ कोणतीही स्पर्धा जिंकू शकतो. या संघात आयसीसीची प्रत्येक स्पर्धा जिंकण्याची क्षमता आहे, असेही लारा म्हणाला. लाराच्या नावावर कसोटीत सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम आहे. त्याने 2004 मध्ये इंग्लंडविरुद्ध 400 धावांची खेळी केली होती. हा विक्रम अद्याप कुणीही मोडू शकलेला नाही.