नागपूर: नववर्षाच्या सुरवातीलाच अवकाळी पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने संकटात सापडलेला शेतकरी आणखीन चिंताग्रस्त झाला आहे. नवीन वर्षाच्या सुरवातीलाच राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. तर काही ठिकाणी गारपीट झाली आहे. यामुळे रब्बी पिकांना मोठा फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे. राज्यात वाशिम, नांदेड, यवतमाळ, हिंगोलीत मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. तर विदर्भातील वर्धा, नागपूर आणि अमरावती जिल्ह्यातील काही भागात गारपीट झाली.
नागपूर जिल्ह्यात काटोल तालुक्यातील दिग्रस बुद्रुक, कळमेश्वर तालुक्यातील मोहपा आणि सावनेर तालुक्यातील खापा परिसरात पहाटेच्या सुमारास गारपीट झाली. बोरांच्या आकाराच्या या गारपिटीमुळे काही घरांच्या छताचे नुकसान देखील झाले. तसेच रब्बी पिकांचे नुकसान झाल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. आंबिया आणि मृग बहरातील संत्रा पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच भाजीपाला, कपाशी, गहू, चना पिकाचे नुकसान झाले आहे.
अमरावती जिल्ह्यात रात्री अनेक ठिकाणी गारपीटसह पावसाने हजेरी लावली आहे. या अवकाळी पावसामुळे खरिप हंगामातील तूर, कपाशी आणि रब्बी हंगामातील गहू, हरबरा या पिकांचे नुकसान झाले आहे. परतवाडा, अंजनगाव सुर्जी, धारणी आणि तिवसा या तालुक्यांना अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका बसला आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील अनेक तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. या अवकाळी पावसाने रब्बी पिकांचा हंगाम धोक्यात आला असून गहू, हरभरा, तूर पिकांचे नुकसान झाले आहे. मागिल दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. त्यानंतर कालपासून झालेल्या पावसामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा आणि तूर हे पिक धोक्यात आले आहे.