जयपूर : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यावरही सोमवारी व्यक्तिगत स्वरूपाची टीका करण्यात आली. गेहलोत यांना स्मृतिभ्रंश झाला आहे. त्यांना मानसिक नैराश्य आले आहे, असा शाब्दिक हल्लाबोल भाजपचे प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया यांनी केला.
नागरिकत्व दुरूस्ती कायदा (का), राष्ट्रीय नागरिक नोंदणीपुस्तक (एनआरसी) अशा मुद्द्यांवरून कॉंग्रेस नेते असणारे गेहलोत सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधत आहेत. त्यांचे लक्ष्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपही ठरत आहेत.
त्या टीकेचा समाचार घेण्यासाठी पुनिया यांनी एक निवेदन जारी केले. राजस्थानात कॉंग्रेसच्या राजवटीत काहीच प्रगती झालेली नाही. त्यामुळे अपयश दडवण्यासाठी गेहलोत अनावश्यक वक्तव्ये करत आहेत.
राजस्थान कॉंग्रेसमधील दुहीमुळे मुख्यमंत्रिपदावरून त्यांच्यात असुरक्षिततेची भावना आहे. कुठलेच काम न उरल्याने ते सातत्याने संघ, मोदी, शहा आणि भाजपच्या नावांचा घोष करत आहेत, असे पुनिया यांनी म्हटले. एखाद्या चांगल्या डॉक्टरकडे जाऊन येण्याचा सल्लाही पुनिया यांनी गेहलोत यांना दिला.