कोल्हापूर : कर्नाटक नवनिर्माण सेनेचा अध्यक्ष भीमाशंकर पाटील यांनी मराठी भाषिकांना धमकी दिल्यानंतर कोल्हापुरात हिंसक आंदोलन सुरू झाले आहे. त्यातच काल बेळगावमध्ये कन्नड भाषिकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळल्यानंतर आणखीनच संतप्त प्रतिक्रिया शिवसैनिकांकडून व्यक्त होत आहेत.
कर्नाटकातील कर्नाटक नवनिर्माण सेनेचे तथाकथित अध्यक्ष भीमाशंकर पाटील यांनी चार दिवसांपूर्वी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना गोळ्या घालण्याची भाषा करत धमकावण्याचा प्रयत्न केला होता. भीमाशंकराच्या या वक्तव्याचे पडसाद कर्नाटक व्याप्त सीमा भागातून थेट कोल्हापुरात पडताना दिसून येत आहे.
कोल्हापुरातल्या विविध तालुक्यात शिवसेनेने रस्त्यावर उतरून आंदोलन करायला सुरुवात केली आहे. काल सकाळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील कर्नाटकच्या कोगनोळी टोलनाक्याजवळ कर्नाटकचे मुख्यमंत्री येडुरप्पा आणि भीमाशंकर पाटील यांच्या पुतळ्याचे दहन करत निषेध व्यक्त केला होता.
याला कर्नाटकातील काही संघटनांनी रस्त्यावर उतरत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पुतळ्याचे दहन केले. कर्नाटकातील या आंदोलनाला उत्तर म्हणून काल रात्री युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कोल्हापुरात आंदोलन करत कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला काळे फासत जोडे मारो आंदोलन केले.
त्यातच आज शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने आणि जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली सीबीएस बस स्थानक परिसरातून विराट निषेध फेरी काढली. तसेच कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन देखील केले.
या सगळ्या घटनेनंतर कोल्हापूर शहरातील अप्सरा चित्रपट गृहात कन्नड सिनेमा ही युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घुसून बंद पाडला. त्याचं पोस्टरही उतरविण्यास चित्रपटगृह मालकाला भाग पाडले. दुसरीकडे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कोल्हापूर शहरातील आणि परिसरातील ज्या दुकानांच्या फलकांवर ती कन्नड भाषेतील लिखाणाचा उल्लेख होता ते पोस्टर फाडत त्याला काळही फासण्यात आले.
त्यामुळे शहरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी देखील बंदोबस्तात वाढ केली आहे. या तणावाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव आणि कर्नाटक परिसरात जाणाऱ्या सर्व बसेस चार फेऱ्या रद्द केल्या आहेत.
त्यामुळे बेळगाव आणि कर्नाटकात जाणाऱ्या प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले. जोपर्यंत हा तणाव निवळत नाही तोपर्यंत बस सेवा सुरू करण्यात येणार असल्याचे एसटी महामंडळाने स्पष्ट केले आहे.